Thursday 26 April 2012

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले आजोबागड ।।


आजोबागड किल्ला

बालाघाटाच्या रांगेत रतनगड आणि हरिश्चंद्रगड यांच्या मधोमध अगदी कडेला असलेला आजोबाचा डोंगर एखाद्या पुराण पुरुषासारखा दिसतो. या गडाची ३,००० फुट उभी भिंत ही प्रस्तरारोहकांसाठी एक आव्हान व आगळे-वेगळे लक्ष्य आहे.

इतिहास:
पुराणकथेनुसार, याच गडावर बसुन वाल्मिकींनी रामायण लिहिले. याच गडावर सीतामाईने लव आणि कुश यांना जन्म दिला. लव आणि कुश वाल्मिकींना 'आजोबा' म्हणत असत, म्हणूनच या गडाचे नाव आजोबागड असे पडले. गडावर वाल्मिकींचा आश्रम व समाधी आहे.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे:

पहिली वाट पकडून वाल्मिकी ऋषींच्या आश्रमापाशी साधारणतः अर्ध्या तासात पोहचावे. वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाजवळून गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी वाट नसल्याने आपल्याला मुक्काम आश्रमातच करावा लागतो. येथे गडावर रहाण्यासाठी एक कुटी आहे.जवळच पाण्याचा झरा आहे. जर मुक्कामाचा कार्यक्रम असेल तर जेवणाची सोय आपल्याला घरूनच करून आणावी लागते. आश्रमाजवळून पुढे धबधब्याच्या वाटेने चढत गेल्यास सुमारे एक ते दीड तासानंतर वर एक गुहा लागते. येथे लवकुशाच्या पादुका खडकात कोरलेल्या आहेत. येथे डावीकडे एक पाण्याचे टाके सुद्धा आहे. या गुहेपर्यंत जाण्यासाठी लोखंडी शिडा देखील लावल्या आहेत. याच मार्गाने आश्रमात परतावे. अशा प्रकारे मुंबईहून येणार्‍यांसाठी आजोबाचा गड एक निसर्गरम्य अशी दुर्गयात्राच ठरते. गडाच्या माथ्यावर दोन ते तीन पाण्याची टाकी सोडल्यास पहाण्याजोगे विशेष असे काहीच नाही. अनेक दुर्गवीर रतनगड - आजोबाचा गड - हरिश्चंद्रगड असा ४ ते ५ दिवसांचा ट्रेक करतात.

गडावर जाण्याच्या वाटा:

1. मुंबईहून आसनगाव रेल्वे स्थानकावरून:
गडावर जाण्याचा सरळ आणि सोपा मार्ग म्हणजे मुंबईहून आसनगाव रेल्वे स्थानकावर यावे.येथून शहापूर या गावी रिक्षेने अथवा एस.टी. ने यावे.येथून पहाटेच एस.टी ने अथवा जीपने डोळखांब-साकुर्ली मार्गे'डेणे' या गावी यावे. 'डेणे' गावातून जाताना मध्ये एक पठार लागते. पठारावर तीन वाटा एकत्र येतात. यातील एक बैलगाडीची वाट सरळ वाल्मिकी ऋषींच्या आश्रमापाशी घेऊन जाते. दुसरी वाट कात्राबाईच्या डोंगरात जाते आणि पुढे 'कुमशेत' या गावास जाऊन मिळते. तिसरी वाट मात्र जंगलात जाते. या वाटेने न जाणेच श्रेयस्कर.

2. कल्याण - मुरबाड - माळशेज - डोळखांब या मार्गाने :

कल्याण - मुरबाड - माळशेज - डोळखांब या मार्गाने सुद्धा डेणे गावी पोहचता येते.

3. कसारा - घोटी - राजूर - कुमशेत मार्ग :

गडावरचा माथा पहाण्यासाठी कसारा - घोटी - राजूर - कुमशेत मार्गेजाता येते.

गडावर राहण्याची सोय : गडावरती राहण्यासाठी आश्रम आहे. यात २० जणांना रहाता येते.

जेवणाची सोय : येथे जेवणाची सोय नसल्याने जेवणाचे साहित्य आपण स्वतःच घेऊन यावे.
गडावर पाण्याची सोय : येथे बारामाही पाण्याचा झरा सतत वाहत असतो.

जाण्यासाठी लागणारा वेळ : एक तास.

सूचना : गडावर सापांचे वास्तव्य असल्याने, योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.



नोट : वरील सर्व माहिती "गडवाट"  "महाराष्ट्रातील किल्ले" या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

No comments:

Post a Comment