Tuesday 31 July 2012

रायगड शकावली ..........



११ वे शतक - यादवांची सत्ता गडावर मराठे पाळेगार.
१२ वे शतक - मराठे पाळेगारांनी विजयनगर अथवा. अनागोंदीचे स्वामित्व स्विकारले.
इ.स. १४३६ - अल्लाउद्दीन शहा बहामनी २रा याचे मराठे पाळेगारांनी स्वामित्व स्विकारले.
इ.स. १४७९ - अहमद नगरच्या निजामशहाकडे गड ताब्यात शिर्के येथील देशमुख.
इ.स. १५५८ - अदिलशहाची अधिसत्ता.
इ.स. १६१७ - निजामशाही अधिकारी म्हणून आागा हाजी याकुद इस्तंबोली हा हवालदार.
इ.स. १६१८ - आदिलशाहीच्यावतीने हैबतखानाचा रायरीवर हल्ला, लुट व सबंध खोरे काबीज, हवालदारी राजे पतंगराव याजकडे.
इ.स. १६२१ - राजे पतंगराव यांची बदली होवुन मलिक जमरुत गडाचा हवालदार.
इ.स. १६२४ - निजामशाही अधिकारी म्हणून इब्राहिमखान हा रायरीचा व बारा मावळांचा हवालदार.
६ मे १६३६ - बादशहा शहाजहान याची निजामशाहीवर स्वारी व विजय, मोगल राजधानी पासून दुर असलेला हा अवघड मुलूख सांभाळणे कठीण म्हणून अदिल शहाशी तह. रायरीचा प्रत्यक्ष ताबा चंद्रराव मोऱ्यांकडे.
६ मे १६५६ - शिवरायांनी रायरी जिंकला.
४ सप्टेंबर १६५६ - रायरी हे नांव बदलू रायगड हे नामकरण.
इ.स. १६५७-५८ - आबाजी सोनदेव व रामराव प्रभू यांची नेमणूक
११ डिसेंबर १६६७ - पोर्तुगीज वकील गोंझालो मार्टिनशी वाटाघाटी.
इ.स. १६७० - गडाची दुरुस्ती, व नवीन बांधकाम महाराजांचे कायमस्वरुपी वास्तव्य.
मे १६७२ - इंग्रज वकील उस्टिक रायगडावर.
२१ जुलै १६७२ - डच वकील आब्राहम लेपेकर रायगडावर.
३ जून १६७३ - इंग्रज वकील थॉमस निकल्स रायगडावर.
२२ मे १६७४ - हेन्री ऑक्झेंडनचे आगमन व १३ जुन पर्यंत मुक्काम
२९ मे १६७४ - महाराजांची समंत्रक मुंज.
३० मे १६७४ - सोयराबाई साहेबांशी समंत्रक विवाह.
६ जून १६७४ - जेष्ठ शु. १३ शिवराज्याभिषेक.
१७ जून १६७४ - राजमाता जिजाऊसाहेबांचे पाचाड येथे निधन.
२४ सप्टेंबर १६७४ - अश्विन शु. ५ (ललितापचंमी) दुसरा राज्याभिषेक
२४ सप्टेंबर १६७५ - इंग्रजवकील सॅम्युअल ऑस्टिन गडावर.
७ सप्टेंबर १६७५ - राजाराम साहेबांची मुंज.
१५ मार्च १६८० - राजाराम साहेबांचे लग्न.
३ एप्रिल १६८० - महाराजांचे महाप्रस्थान.
२१ एप्रिल १६८० - राजाराम साहेबांचे मंचकारोहण.
१८ जून १६८० - संभाजी राजांचे पन्हाळयाहून आगमन.
२७ जून १६८० - शिवपत्नी पुतळाबाई साहेब सती.
२० जुलै १६८० - संभाजी राजांचे मंचकारोहण.
२७ ऑक्टोबर १६८० - मोरोपंत पिंगळे यांचे देहावसन.
१६ फेब्रुवारी १६८१ - संभाजी राजांचा विधियुक्त राज्याभिषेक.
ऑगस्ट १६८१ - संभाजी राजांवर विषप्रयोगाचा प्रयत्न.
९ फेब्रुवारी१६८१ - राजाराम महाराजांचे मंचकारोहण.
२५ मार्च १६८९ - झुल्फिकार खानाचा रायगडाला वेढा.
५ एप्रिल १६८९ - राजाराम महाराज रायगडावरुन निसटले.
३ नोव्हेंबर १६८९ - गड मोगल्यांच्या हाती - इस्लामाबाद नामकरण.
इ.स. १६९० - मोगलांतर्फे गडाचा ताबा सिद्दीकडे.
६ जून १७३३ - रायगड पेशव्यांनी घेतला, ताबा पंतप्रतिनिधींकडे.
१८ मार्च १७७३ - रायगड पेशव्यांच्या ताब्यात.
जून १७९६ - नाना फडणविसांचा मुक्काम व गडाची डागडुजी.
इ.स. १८०२ - दुसऱ्या बाजीरावाचे गडावर वास्तव्य.
२ फेब्रुवारी १८१० - रायगड-माची येथे दुसऱ्या बाजीरावाचा मुक्काम.
इ.स. १८१६ - रायगड इंग्रजांकडे परंतु लगेच त्याचा ताबा पेशव्यांकडे, पेशवे गड सोडिनाच.
२५ एप्रिल १८१८ - इंग्रजांचा रायगडाला वेढा.
४ मे १८१८ - खुब लढयावर इंग्रजांचा भडिमार.
६ मे १८१८ - पोटल्याच्या डोंगराकडून केलेल्या भडिमाराने गडावर जाळपोळ.
१० मे १८१८ - रायगडावरील स्वातंत्र्यसुर्य मावळला तह होवुन गड इंग्रजांकडे.




||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥


नोट : वरील सर्व माहिती " गडवाट " या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट (-by Raj Jadhav
) चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .



Thursday 26 July 2012

प्रवास एका शिवभक्ताचा :- || किल्ले सज्जनगड ||


सज्जनगड किल्ला
किल्ल्याची उंची : समुद्रसपाटीपासून सुमारे ३००० फुट उंच आहे तर पठारापासून १००० फुट ऊंच आहे.
किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग
किल्ल्याचा आकार : शंखाकृती
जिल्हा सातारा
श्रेणी : मध्यम
 
इतिहास :

  सातारा शहराच्या पश्चिमेस दहा किलोमीटर सज्जनगड अंतरावर हा किल्ला आहे. समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने या गडास धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे.
सज्जनगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. आश्वलायन कृषींचे वास्तव्याचे स्थान म्हणून आश्व्लायनगड, अस्वलांची येथे वस्ती म्हणून अस्वलगड, नवरसतारा,अशी आणखीही काही नावे इतर कालखंडात याला लाभली आहेत. परळी गावाकडील दरवाज्यातूनच किल्ल्यात प्रवेश करता येतो. इतर ठिकाणी उभा कडा किंवा बांधिव तटबंदीने प्रवेश दुष्कर केला आहे.
रतापगडाच्या पायथ्यापासून सहयाद्रीची एक उपरांग शंभूमहादेव या नावाने पूर्वेकडे जाते. या रांगेचे तीन फाटे फुटतात. त्यापैकी एका रांगेवर समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सज्जनगड उर्फ परळीचा किल्ला वसलेला आहे सातारा शहराच्या नैऋत्येस अवघ्या दहा की.मी. अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्यात हा दुर्ग उभा आहे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३००० फुट उंच आहे तर पठारापासून १००० फुट ऊंच आहे. किल्ल्याचा आकार शंखाकृती आहे. याचा परीघ १ कि.मी हून अधिक आहे. पश्चिमेस खेड - चिपळूण , उत्तरेस महाबळेश्वर, प्रतापगड, रायगड, दक्षिणेकडे कळंब, ईशान्येस सातारा शहर ,अजिंक्यतारा आहे.

प्राचीन काळी या डोंगरावर आश्वालायन ऋषींचे वास्तव्य होते,त्यामुळे या किल्ल्याला 'आश्वलायनगड' म्हणू लागले.या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज ह्याने ११ व्या शतकात केली.२ एप्रिल इ.स. १६७३ मध्ये शिवाजी राजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. शिवरायांच्या विनंती वरून समर्थ रामदास गडावर कायमच्या वास्तव्यासाठी आले. किल्ल्याचे नामकरण करण्यात सज्जनगङ आले. पुढे राज्याभिषेकानंतर शिवाजीराजे सज्जनगडावर समर्थांच्या दर्शनास आले.
पुढे ३ नोव्हेंबर, इ.स. १६७८ रोजी शिवरायांनी संभाजी महाराजांना समर्थांकडे पाठवले. पण ३ डिसेंबर, इ.स. १६७८ रोजी संभाजी महाराज सज्जनगडावरून जाऊन दिलेरखानाला मिळाले. शिवरायांच्या निधनानंतर १८ जानेवारी, इ.स. १६८२ रोजी श्री राममूर्तींचे गडावर स्थापना करण्यात आली. २२ जानेवारी, इ.स. १६८२ मध्ये समर्थांचे निधन झाले. या नंतर पुढे २१ एप्रिल, इ.स. १७०० मध्ये फतेउल्लाखानाने सज्जनगडास वेढा घातला. ६ जून, इ.स. १७०० ला सज्जनगड मोगलांच्या ताब्यात गेला व त्याचे 'नौरससातारा' म्हणून नामकरण झाले. इ.स. १७०९ मध्ये मराठ्यांनी पुन्हा किल्ला जिंकला. इ.स. १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या हाती पडला.


गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
 
गडावर शिरतांना लागणाऱ्या पहिल्या दरवाजाला 'छत्रपती शिवाजी महाराजद्वार'असे म्हणतात. हे द्वार आग्नेय दिशेस आहे
आणि दुसरा दरवाजा पूर्वाभिमुख असून त्याला 'समर्थद्वार' असेही म्हणतात. आजही हे दरवाजे रात्री दहा नंतर बंद होतात. दुसऱ्या दारातून शिरतांना समोरच एक शिलालेख आढळतो.
गड चढण्यासाठी पायऱ्याआहेत. अर्ध्या वाटेवर कल्याण स्वामीयांचे मंदिर आहे.पुढे गेल्यावर एका बाजूस मारुतीचे व दुसऱ्या बाजूस गोतमी चे मंदिर आहे.किल्ल्याचा दरवाजात श्रीधर स्वामीयांनी स्थापन केलेल्या मारुती व वराहाच्या मूर्ती आहेत.प्रवेशव्दाराच्या डाव्या बुरुजाजवळ आम्ग्लाई देवीचे मंदिर आहे.अंगापूर च्या कृष्णा नदीच्या डोहात रामादांना रामाच्या मूर्ती ,अंगलाई ची सापडली होती.आंगलाई मंदिर समर्थांनी बांधले.रामदासांचे वास्तव्य होते शके १६०३ माघा नवमी (सन १६८२ ) समर्थांनी समाधी घेतली.समाधीवर राममूर्ती बसवून शिष्यांनी देऊळ बांधले..श्रीराम मंदिराच्या सभामंदापात सिद्धिविनायक व हनुमानाची मूर्ती आहे.मुख्य मंदिरात राम,लक्ष्मण,सीता च्या पंचधातूचा मूर्ती आहेत.जवळच समर्थांची धातूची मूर्ती आहे.भुयारात समर्थांचे समाधीस्थान आहे.समाधी मागील कोनाड्यात पितळी पेटीत दत्तात्रेयाच्या पादुका आहेत.मंदिरा बाहेर एका कोपऱ्यात मारुती आहे.दुसऱ्या कोपऱ्यात समर्थशिष्या वेणा हिचे वृंदावन आहे.मंदिरा पुढे उत्तर बाजूस आणखी एक शिष्या आक्काबाई वृंदावन आहे.माघ वद्द प्रतिपदा ते नवमी या काळात दासनवमी चा उत्सव साजरा करतात.
ज्या पायऱ्यांनी आपण गडावर प्रवेश करतो त्या पायऱ्या संपायच्या अगोदर एक झाड लागते. या झाडापासून एक वाट उजवीकडे जाते. या वाटेने ५ मिनिटे पुढे गेल्यावर एक रामघळ लागते. ही रामघळ समर्थांची एकांतात बसण्याची जागा होती. गडावर प्रवेश केल्यावर डावी कडे वळावे. समोरच घोड्यांना पाणी पाजण्यासाठीचे घोडाळे तळे दिसते. घोडाळे तळ्याच्या मागच्या बाजूस एक मशिदवजा इमारत आहे तर समोरच आंग्लाई देवीचे मंदिर आहे. ही देवी समर्थांना चाफळच्या राममूर्ती बरोबरच अंगापूरच्या डोहात सापडली.

गडावरील प्रमुख आकर्षण म्हणजे समर्थांचा मठ व श्रीरामाचे मंदीर. समर्थनिर्वाणानंतर संभाजी राजांच्या सांगण्यावरुन भुयारातील स्मारक व त्यावर श्रीरामाचे मंदीर उभारले. मंदिरालगतच अशोकवन, वेणाबाईचे वृंदावन, ओवर्‍या, अक्काबाइचे वृंदावन, आणि समर्थांचा मठ या वास्तु आहेत. जीर्णोध्दार केलेल्या मठात शेजघर नावाची खोली आहे. त्यामधे पितळी खुरांचा पलंग, तंजावर मठाच्या मेरुस्वामी यांनी समर्थांना प्रत्यक्ष पाहून काढलेले चित्र, समर्थांची कुबडी, गुप्ती, दंडा, सोटा, पाण्याचे दोन मोठे हंडे, पाणी पिण्याचा मोठा तांब्या, पिकदाणी, बदामी आकाराचा पानाचा डबा, वल्कले व प्रताप मारुतीची मूर्ती आहे. गुप्तीचे वैशिष्ट्य़ म्हणजे त्यात एक लांबच लांब धारदार तलवार आहे.
राममंदीर व मठाच्या मधील दरवाज्याने पश्चिमेकडे गेल्यास उजव्या हातास एक चौथरा व त्यावर शेंदूर फासलेला गोटा आहे. त्यास ब्रम्हपिसा म्हणतात.
गडाच्या पश्चिमे टोकावर एक मारुती मंदिर आहे त्यास धाब्य़ाचा मारुती असे म्हणतात.
गडाच्या उत्तरेस बाटेवरच गायमारुती व कल्याण स्वामी मंदिर आहे. गायमारुती देवळाजवळून कड्याच्या कडेकडेने एक पायवाट जाते, साधारणत: १०० मी. अंतरावर एक गुहा आहे. त्याला रामघळ म्हणतात.

नोट : सज्जनगडाच्या पायथ्याशी परळी गावालगतच केदारेश्वर महादेव व विरुपाक्ष मंदिर अशी २ प्राचीन शिवमंदिरे आहेत. तेथील कोरीव शिल्प पाहण्याजोगे आहे.कुस गावापासून जवळच मोरघळ नावाची गुहा प्रेक्षणीय़ आहे
 

गडावर जाण्यासाठी  मार्ग : गडावर जाण्यासाठी  मार्ग दोन मार्ग आहेत. त्यांपैकी एक गाडीमार्ग आहे.

१.
परळी पासून : सातारा ते परळी अंतर १० की.मी.चे आहे. परळी हे पायथ्याचे गाव. परळी पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. साधारण १८० पायऱ्यांनंतर गडाचा दरवाजा लागतो. गडावर जाण्यास परळीपासून एक तास पुरतो .

 २
. गजवाडी पासून : एस.टी. महामंडळाच्या बसने सातार्‍याहून जाता येते. सातारा परळी रस्त्यावर परळीच्या अलीकडे ३ की.मी.वर गजवाडी गाव लागते. तेथून थेट गडाच्या कातळ माथ्यापर्यंत गाडीने जाता येते. येथून पुढे १०० पायऱ्यांनंतर दरवाजा लागतो.रस्त्यापासून गडावर जाण्यास १५ मिनिटे पुरतात.

जाण्यासाठी लागणारा वेळ:-
गडावर जाण्यास परळीपासून साधारणता एक तास लागतो गजवाडी पासून १०० पायऱ्यांनंतर गडावर जाण्यास १५ मिनिटे पुरतात.

जेवण्याची सोय:- आपण स्वतः जेवणाची सोय करावी.


पाण्याची सोय:- गडावर पाण्याची सोय आहे
.तरी पण आपण सोबत १ पाण्याची बॉटल ठेवाव.

राहण्याची सोय:- गडावरील
  मंदिरात १० ते १२ जनाची राहण्याची सोय होते

नोट :
वरील सर्व माहिती " गडवाट " या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट (-by स्वप्नांची दुनिया) चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल . 

Wednesday 18 July 2012

प्रवास एका शिवभक्ताचा :- || किल्ले माहुली ||

माहुली किल्ला
किल्ल्याची उंची : ----- 
किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग 
जिल्हा :  ठाणे  
श्रेणी : मध्यम


किल्ले माहुली हा ठाणे जिल्ह्यातील किल्ला असून चढाई साठी मध्यम श्रेणीचा आहे. 
ठाणे जिल्ह्यात शहापूर-आसनगावाज वळ एक दुर्गत्रिकुट आहे. माहुली-भंडारगड आणि पळसगड मिळून हे बळकट ठाणे तयार झाले आहे. मुद्दाम जाऊन पहावे असे हे ठिकाण कोणाही निसर्गप्रेमी माणसाला आपल्या निसर्गसौंदर्यान वेड लावते. अनेक सुळके असलेला लांबलचक असा हा डोंगर माहुली नावाने ओळखला जातो. माहुलीचे दोन खोगिरामुळे तीन भाग पडले आहेत. उत्तरेचा पळसगड, मधला माहुलीगड आणि दक्षिणेचा भंडारगड.


इतिहास : 


हा किल्ला कोणी बांधला याबद्दल काहीच माहिती नाही पण निजामशाहीत हा किल्ला शहजीराजेंकडे होता पण परकीय आक्रमणासमोर सैन्यबळ कमी असल्याकारणे त्यांना तो मुघलांच्या स्वाधीन करावा लागला नंतर शिवरायांनी हा किल्ला स्वराज्यात शामिल केला. जवळ जवळ ३ वेळा हा किल्ला परकीयांनी हल्ले करून स्वराज्याकडून जिंकून घेतला आहे पण नंतर तिन्ही वेळा शिवरायांनी माहुली किल्ला पुन्हा जिंकला यावरूनच या किल्ल्याचे महत्व काय असावे याचा अंदाज बांधलेलाच बरा.

गडावर जाण्याच्या वाटा:-

मुंबईहून ठाणे मार्गे आसनगाव ला जाणारी आगगाडी असते. आसनगाव ला उतरून ठेतून ५ किमी अंतरावर माहुली हे पायथ्याचे गाव आहे(बहुदा रिक्षा असतात नसेल तर पायीच जावे लागते). 
मुंबई(छत्रपती शिवाजी टर्मिनस) हून सकाळी ६:१० ला आसनगाव गाडी आहे ती ७:०५ ला ठाणे आणि ८:१४ ला आसनगाव ला पोहचते. 

पुणे ते माहुली (किल्ल्याचे पायथ्याचे गाव) अंतर साधारण १८५ किमी आहे. पुण्याहून राष्ट्रीय महामार्ग ४ ने लोणावळा-खोपोली- खालापूर-पनवेल ला यावे पनवेल हून ४ किमी पुढे आले कि कळंबोली सर्कल लागेल तिथून उजवीकडे वळण घेऊन शिळफाटा मार्गाने सरळ यावे पुढे मुब्रा कडे जाणारे दोन रस्ते फुटतात पुढे ते एकाचे ठिकाणी मिळतात पण सरळ मार्गाने आलो तर गाड्यांची जास्त वरदळ असल्याने वेळ लागेल तर डावीकडील रस्त्याने लवकर जाता येते इथून सरळ पुढे यावे काही अंतरावा आल्यावर राष्ट्रीय महामार्ग ३ लागेल तिथे पुन्हा उजवीकडे वळण घेऊन सरळ मार्गे यावे. या मार्गाने येत असताना जवळच्या परिसरात असणारी गावे - माणकोली - सरावली- तळोली - पडघा-वाशिंद(या गावातून मार्ग नाही आपण येणाऱ्या मार्गाने आजू बाजूला असणारी गावे आहेत). वाशिंद गावात जाण्यासाठी उजवीकडे रस्ता आहे तर डावीकडे माहुली किल्ला आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ:- आसनगावातून गडावर पोहचायला २ ते २:३० तास लागतात. १ ते १:३० तास पुष्कळ आहे गड पाहणी करण्याकरिता.

जेवण्याची सोय:- आपण स्वतः जेवणाची सोय करावी तेव्हा प्रत्येकाने पोटभर जेवणाचा डब्बा सोबत  ठेवावा .

पाण्याची सोय:- गडावर पाण्याची सोय नाही तेंव्हा आपण स्वतः पाण्याची सोय करावी लागते.

राहण्याची सोय:गडावर राहण्याची सोय सोय नाही.


||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||

॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥


नोट : वरील सर्व माहिती "महाराष्ट्रातील किल्ले" या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .  

Wednesday 11 July 2012

प्रवास एका शिवभक्ताचा :- || किल्ले शिवनेरी ||



स्थळ : जुन्नर 
परिसर : जुन्नर 
 जिल्हा : पुणे 
 उंची : 3342 फुट  
श्रेणी : सोप्पी 
 भ्रमंती : उत्क्रष्ट .


जुन्नर  नाव उचारलेकी अनेकांच्या डोळ्या समोर उभे राहते किल्ले शिवनेरी . यथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ..... मराठ्यांचे आराध्ये देवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला ते तीर्थक्षेत्र..!!!
 
 


या  किल्लायाला   भेट  दयाची असेल तर  पुण्यावरून जुन्नर या  गावी  यावो  लागतो . जुन्नर  बस -स्थानकाच्या समोर शिवनेरी किल्ला उभा आहे. किल्ल्याला दोन वाटा आहेत. एक  सात वाहन कालीन  राजद्र्वाज्याची  वाट तर  दुसरी  साखळीची  वाट .
 

||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥


शिवचरित्रमाला : "" दुर्ग ""








"हे दुर्ग म्हणजे काही लोणावळा, माथेरान किंवा आपल महाबळेश्वर नव्हे. नुसत डोंगर चढणं आहे. रान तुडवण आहे. स्वत:चं अंथरूण पांघरूण पाठीवर वागवीत रानोमाळ हिंडाव लागतं. तिथं असतो भराट वारा. असतं कळा कळा तापणार ऊनं. असतात मोकाट डोंगरदरे. पण हे आव्हान असतं जिद्दीला. पुरूषार्थाला...!

ध्यानात घ्या, तिथं आपले पराक्रमी पूर्वज काही एक इतिहास घडवून गेले आहेत. कित्येकदा त्यांचा जय झाला. कित्येकदा पराभवही. कधी कधी दुर्गुणांनी त्यांच्यावर मात केली असेल. हे बलवंत दुर्ग मुकाट्यान शत्रूच्या ताब्यात द्यावे लागले असतील त्यांना. त्या सगळ्या प्राचीन इतिहासाच स्मरण हा आहे या दुर्गभ्रमंतीमागचा उद्देश...!"

"गड कसा पाहावा याचं एक तंत्र आहे.तो धावता पळता पहाता उपयोगाचा नाही. त्याची भौगोलीक पार्श्वभूमी, त्याचं नकाशातील स्थान, संरक्षणदृष्ट्या त्याचं महत्वं, त्याच्या जवळ असलेले घाट, मैदान, खिंडी, पठार, नद्या, ओढे, रणक्षेत्र, त्यावर चढायचे मार्ग, त्यावरून दिसणारा प्रदेश, त्या प्रदेशातील किल्ले, शिखरं, त्यांची मजबूती, त्यावरील पाण्याची ठिकाणं-हौद, तलाव, त्याचे तट, त्याचे बुरूज, त्याची प्रवेशद्वारं.... हे सगळं कसं नीट तपासलं पाहिजे, तरचं त्याचं महत्व ध्यानी येतं. धावता पळता किल्ला बघायला तो काही भोज्जा नव्हे ! धावता पळता त्याला नुसतं शिउन जाणं म्हणजे त्याचाही अपमान, आपलाही."

... गो. नी. दांडेकर.





 
||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥

Tuesday 10 July 2012

शिवचरित्रमाला : "" हेर ""



हेर म्हणजे महाराजांचा तिसरा डोळा

महाराजांचं हेर खातं अत्यंत सावध आणि कुशल होतं. त्यात एकूण किती माणसं काम करीत होती हे तपशीलवार मिळत नाही. बहिर्जी नाईक जाधव , वल्लभदास गुजराथी , सुंदरजी परभुजी गुजराथी , विश्वासराव दिघे एवढीच नावे सापडतात. पण गुप्तरितीनं वावरणाऱ्या या गुप्तहेर खात्यात बरीच माणसे असली पाहिजेत असे वाटते. परदरबारात राजकीय बोलणी करण्यासाठी जाणारे स्वराज्याचे सारे वकील एकप्रकारे गुप्तहेरच होते. मुल्ला हैदर , सखोजी लोहोकरे , कर्माजी , रघुनाथ बल्लाळ कोरडे आदी मंडळी महाराजांच्या वतीने परराज्यांत वकील म्हणून जात होती. पण तेवढीच हेरागिरीही करताना ती दिसतात. पण आणखीन एक उदाहरण या शाहिस्तेखान प्रकरणात ओझरते दिसते. लाल महालात असलेल्या छोट्याशा बागेचे काम करणारा माळी महाराजांचा गुप्तहेर असावा. लाल महालांत घडणाऱ्या अनेक घटना अगदी तपशीलाने महाराजांना समजत होत्या , हे आपल्या सहज लक्षात येते. शाहिस्तेखानाच्या ज्या ज्या सरदारांनी कोकण भागात स्वाऱ्या केल्या , त्या प्रत्येक स्वारीत शिवाजीराजांनी अत्यंत त्वरेने आणि तडफेने त्या स्वाऱ्या पार उधळून लावल्या. हे या मराठी हेरागिरीचेही यश आहे. अफाट समुदावर तर हेरागिरी करणं किती अवघड , मराठ्यांनी सागरी हेरागिरीही फत्ते केली आहे.

आता तर महाराज प्रत्यक्ष लाल महालांवरच एका मध्यरात्री छापा घालणार होते. सव्वा लाख फौजेच्या गराड्यात असलेला लालमहाल पूर्ण बंदोबस्तात होता. खानाने या महालांच्या दालनांत काही काही फरक केले होते. म्हणजे बांधकामे केली होती. कुठे भिंती घातल्या होत्या , कुठे दरवाजे बांधकामाने चिणून बुजवून टाकले होते. जनान्याचे भाग , मुदपाकखाना , पुरुषांच्या खोल्या इतर खोल्या , त्यांवरील पहाऱ्यांच्या व्यवस्था इत्यादी अनेक गोष्टी लाल महालाबाहेर कोणाला तपशीलवार समजणे सोपे नव्हते. पण महाराजांनी जो लाल महालावर छापा घालण्याचा बेत केला , तो अगदी माहितगारी असलेल्या कोणा मराठी हेराच्या गुप्त मदतीनेच. जर अधिक माहिती ऐतिहासिक नव्या संशोधनाने उपलब्ध होईल , तर हे मराठी हेरखात्याच्या कर्तबगारीवर छान प्रकाश पडेल. आज मराठ्यांना मिळालेल्या यशांचा तपशील लक्षात घेऊन हेरांचे कर्तृत्त्व मापावे लागते आहे.

हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा. तो अखंड उघडा आणि सावधच असावा लागतो. शिवकाळातील हेरखाते हे निविर्वाद अप्रतिम होते. हेर पक्का स्वराज्यनिष्ठ असावाच लागतो. तो जर परकीयांशी ‘ देवाणघेवाण ‘ करू लागला , तर नाश ठरलेलाच असतो. हेर अत्यंत चाणाक्ष , बुद्धीवान आणि हरहुन्नरी असावा लागतो. पुढच्या एका घटनेचा आत्ता नुसता उल्लेख करतो. कारवारच्या मोहिमेत मराठी हेरांनी उत्तम कामगिरी केली. पण एका हेराकडून कुचराई आणि चुका झाल्या. महाराजांनी त्याला जरब दाखविलीच.

आता महाराज प्रत्यक्ष लाल महालावरच झडप घालून शाहिस्तेखानाला ठार मारण्याचा विचार करीत होते. ही कल्पनाच अफाट होती. सव्वा लाखाची छावणी. त्यात बंदिस्त लाल महाल. त्यात एका बंदिस्त दालनात खान. अन् त्याला गाठून छापा घालायचा. हे कवितेतच शक्य होते. पण असं अचाट धाडस महाराजांनी आखले. हल्लीच्या युद्धतंत्रात ‘ कमांडोज ‘ नावाचा एक प्रकार सर्वांना ऐकून माहिती आहे. महाराजांचे सारेच सैनिक कमांडोज होते. पण त्यात पुन्हा अधिक पटाईत असे जवान महाराजांपाशी होते. त्याचे प्रत्यंतर लाल महालाच्या छाप्यात येते. ‘ ऑपरेशन लाल महाल ‘ असेच या छाप्याला नाव देता येईल. ही संपूर्ण मोहिम मुख्यत: हेरांच्या करामतीवर अवलंबून होती. सारा तपशील एखाद्या स्वतंत्र प्रबंधातच. मांडावा लागेल. पण या ऑपरेशन लाल महालचा अभ्यास महाराजांनी आपल्या सहकाऱ्यांनिशी इतका बारकाईने केला आहे की , आपले मन या एकविसाव्या शतकाच्या वेशीत थक्क होऊन जाते. या गनिमी छाप्यासाठी महाराजांनी वेळ निवडली मध्यरात्रीची. मराठ्यांचे बहुसंख्य छापे रात्रीच्या अंधारातलेच आहेत. लाल महालावरच्या छाप्यासाठी महाराजांनी चैत्र शुद्ध अष्टमीची मध्यरात्र निवडली. पुढच्या उजाडत्या चैत्र शुद्ध नवमीस प्रभू राम जन्मास येणार होते! रामनवमी.

याच महिन्यात मोगलांचे पवित्र रोज्याचे उपवास सुरू झाले होते. छाप्याच्या रात्री सहावा रोजा होता. आकाशातला चंद छाप्याच्या सुमारास पूर्ण मावळणार होता. पण याचा इथं कुठं संबंध आला ? आला ना! मोगली सैन्य रोजाच्या उपवासामुळे रात्र झाल्यावर भरपूर जेवण करून सुस्तावणार हा अंदाज खरा ठरणार होता. खुद्द शाहिस्तेखानाच्या कुटुंबात हीच स्थिती असणार. शिवाय दिवस उन्हाळ्याचे. शेजारीच असलेल्या मुठा नदीला पाणी जेमतेमच असणार. छापा घालून झटकन ही नदी ओलांडून भांबुडर््याच्या (सध्याचे शिवाजीनगर) भागात आपल्याला पसार होता येणार आणि अगदी जवळ असलेल्या सिंहगडावर पोहोचता येणार हे लक्षात घेऊन महाराजांनी हे ऑपरेशन आखले होते.

छाप्यातल्या कमांडोजनी कसेकसे , कुठेकुठे , कायकाय करायचे ते अगदी निश्चित केलेले होते. संपूर्ण तपशीलच इतका रेखीव आहे की , या ऑपरेशन लाल महालची आठदहावेळा महाराजांनी राजगडावर ‘ रिहर्सल ‘ केली असावी की काय असा दाट तर्क-तर्कच नव्हे खात्री होते. कारण जे घडले ते इतके बिनचूक घडले की , असे घडणे कधीही ऐत्यावेळेला होत नसते. आपण तपशील पाहूच.


||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥
मराठ्यांचा नाद खुळा….!!


नोट : वरील सर्व माहिती "गडवाट" या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

प्रवास एका शिवभक्ताचा :- सह्याद्रीतील डोंगरवाट काय पाहाल...



सह्याद्री पर्वत रांग

अनुभवावा गुहेतला मुक्कामघाटघरहून जीवधन किल्ल्याला बगल देणारा चार किलोमीटरचा अगदी नाणेघाटाच्या मुखाशी गाडी जाण्यायोग्य रस्ता आहे. मुखाशीच डाव्या बाजूला गणेशाची प्रतिमा असलेली गुहा आणि काही उपगुहा आहेत. उजव्या हाताला जकातीचा दगडी रांजण आहे. शंभर-दीडशे मीटरची खडकाळ उतरण उतरली की आपण नाणेघाटाच्या मुख्य गुहेशी येऊन पोचतो. तिच्या समोर आणि माथ्यावर आणखी चारपाच गुहा आहेत. तिच्यासमोरुन पुढे खोदलेली पाण्याची चार-पाच टाकी दिसून येतात. त्यातील सर्वात शेवटच्या टाक्यातले पाणी पिण्यायोग्या आहे. हे सर्व पाहून पुन्हा खिंडीच्या घाटावरील मुखाशी यावे आणि डावीकडे गणेशमूर्तीच्या बाजूने जाणार्‍या वाटेने थोडी चढण चढून वर जावे. हाच तो प्रसिद्ध ‘नानाचा अंगठा’. म्हणजे नाणेघाटाच्या सर्व गुहा ज्या डोंगरात खोदल्या आहेत तो डोंगर. माथ्यावरुन आसपासच्या परिसराचे विहंगन दृश्य दिसते. मागच्या बाजूला जीवधन किल्ला आणि...त्याचा चिरपरिचित, सगळ्या क्लाइंबर्सचे आव्हान असणारा वानरलिंगी ऊर्फ खडा पारशी. मग त्यापुढे क्रमाक्रमाने दार्‍या घाट, ढाकोबा, दुर्ग, अहुपे घाट अशी सह्याद्रीची सर्वांगसुंदर रांग आहे. राहण्याची सोय गुहेत होतेच. हवे असेल तर जेवणाची सोय तीन किलोमीटरवरील घाटघर गावात होऊ शकते. जुन्नरवरुन घाटघरला जाण्यासाठी दिवसातून दोन एसटी बस आहेत. खाजगी जीपने देखील घाटघरला पोचता येते. दोन दिवसांचा बेत करुन नाणेघाटाबरोबरच जीवधनचा ट्रेकही आखता येईल. आसपासच्या परिसरात जीवधन, चावंड, हडसर, ढाकोबा, दार्‍या घाट ट्रेकर्सची खास ठिकाणे आणि अंबोली (ता. जुन्नर) सारखे निसर्गरम्य ठिकाण आहेत. नानाच्या अंगठ्यावरुन पाहता पावसाळ्यात ढगांचा कापूस सह्यकड्यांशी मस्ती करत असतो तर इतर ऋतूमध्ये समोरचा सगळा कोकणचा परिसर आपण कवेत घेतल्याचा भास होतो. नानाच्या अंगठ्यावरुन पाहिलेला सूर्यास्त हा तर कुणीही उभ्या जन्मात विसरणे शक्य नाही. हाच सूर्यास्त पाहून पुन्हा मुख्य गुहेत मुक्कामाला यावे आणि मस्त शेकोटी पेटवून मित्रमंडळींसमवेत आयुष्याची शिदोरी सोडून सर्व ट्रेक्सच्या अनुभवाची उजळणी करावे, गप्पांचा फड जमवून तारे मोजत रात्र जागवावी, किंवा कोकणकड्यावर कोसळणार्‍या तुफानी पावसाची आणि साथीने कोसळणार्‍या जलप्रपातांची गाज कानात साठवून घ्यावी. निद्रादेवी कधी पाश टाकेल ते समजणारच नाही. दुसर्‍या दिवशी जाग येईल तेव्हा एक नवीन बेफाम अनुभव गाठीशी आला असेल. आपापला कचरा गोळा करावा आणि पुढल्या वीकेंडला कुठे याचा विचार सुरु करावा.

सह्याद्री पर्वत रांगा

उपयुक्त माहिती:

जाण्याचे मार्ग:

१. पुणे-नारायणगाव-जुन्नर-आपटाळे-चावंडवाडी-घाटघर-नाणेघाट

२. मुंबई-कल्याण-वैशाखरे-नाणेघाट (ट्रेकचा मार्ग)

३. मुंबई-कल्याण-वैशाखरे-माळशेज घाट-जुन्नर-आपटाळे-चावंडवाडी-घाटघर-नाणेघाट

४. नाशिक-संगमनेर-आळेफाटा-नारायणगाव-जुन्नर-आपटाळे-चावंडवाडी-घाटघर-नाणेघाट.

आसपासचा परिसर:

१. शिवनेरी (जुन्नर)
२. जीवधन
३. दार्‍या घाट
४. दुर्ग-ढाकोबा जुळे किल्ले.
५. चावंड किल्ला.
६. हडसर किल्ला

 

टिप्स: मुक्कामाची सोय नाणेघाटाच्या मुख्य गुहेत स्वतः करावी. जेवणाची सोय घाटघर गावात होऊ शकते.घाटघर गावातून विजवाहक तारांच्या दिशेने जाणार्‍या रस्त्याने पुढे जावे, तो रस्ता बरोबर नाणेघाटात जातो.मोठा ट्रेक हवा असेल तर नाणेघाटात मुक्काम करुन पुढे जीवधन किल्ला करावा.

Monday 9 July 2012

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले लोहगड ।।


लोहगड किल्ला

किल्ल्याची उंची : ----- 
किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग 
डोंगररांग : लोणावळा 
जिल्हा : पुणे 
श्रेणी : सोपी


इतिहास : 

लोहगड किल्ला हा अति मजबूत, बुलंद आणि दुर्जेय आहे.गडाची निर्मिती जवळ असलेली भाजे आणि बेडसे हि लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याहि पूर्वी म्हणजे सत्तावीसशे वर्षापूर्वी झाली असावी असे अनुमान निघते. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकुट, यादव या सर्व राजवटी किल्ल्याने पाहिल्या इ.स.१४८९ मध्ये मलिक अहमंदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले. त्यापैकी लोहगड हा एक. इ.स.१५६४ मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुरहण या किल्यावर कैदेत होता. इ.स. १६३० मध्ये किल्ला आदिलशाहीत आला. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड-विसापूर हा सर्व परिसर सुध्दा स्वराज्यात सामील करून घेतला. इ.स.१६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे १३ मे १६७० मराठ्यांनी किल्ला परत जिंकला. पहिल्या सुरात लुटेच्या वेळेस आणलेली संपती नेताजी पालकरांनी लोहगडावर आणून ठेवली होती. इ.स.१७१३ मध्ये शाहूमहाराजांनी कृपावंत लोहगड कान्होजी आंग्रे यांस दिला १७२० मध्ये आंगर्यांकडून तो पेशव्यांकडे आला. १७७० मध्ये नाना फडणविसांचा सरदार जावजी बोंबले याने आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला.इ.स.१७८९ मध्ये नानांनी सोळा कान असलेली एक बाव व तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला, त्याचा अर्थ असा- शके १७११ मध्ये बाळाजी जनार्दन भानू- नाना फडणवीस यांनी हि बाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट यांचेकडून बंधीवली. नानांनी आपले सर्व द्रव्य नित्सुर्यांच्या निगराणीस लोहगडावर आणले. १८०० मध्ये नित्सुर्यांचा कैलासवास झाला. १८०२ मध्ये त्यांच्या पत्नी किल्ल्यावर येऊन राहिल्या. १८०३ मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला. पण नंतर दुसर्या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. ४ मार्च १८१८ ला जनरल प्रोंथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्वप्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्या दिवशी मराठे लोहगड सोडून गेले.   
   

गडावर पाहण्याची ठिकाणे : 
गडावर चढतांना आपल्याला सलग चार प्रवेशद्वारांमधून आणि सर्पाकार मार्गावरून जावे लागते. सर्वप्रथम गणेश १. गणेश दरवाजा:-ह्याच्याच डाव्या आणि उजव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटीलकी देण्यात आली होती. येथे आतील बाजूस शिलालेख आहेत. २. नारायण दरवाजा:- हा दरवाजा नाना फडणीसांनी बांधला. येथे एक भुयार आहे, जिथे भात आणि नाचणी साठवून ठेवण्यात येई. ३. हनुमान दरवाजा:- हा सर्वात प्राचीन दरवाजा आहे. ४. महादरवाजा:- हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. यावर हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे. या दरवाजाचे काम नाना फडणीसांनी १ नोव्हेंबर १७९० ते ११ जुने १७९४ या कालावधीत केले. महादरवाजातून आत शिरताच एक दर्गा लागतो.दर्ग्याच्या शेजारी सदर व लोहारखानाचे भग्न अवशेष आढळतात. याच दर्ग्याच्या बाहेर बांधकामाचा चुना बनविण्याचा घाना आहे. उजवीकडे ध्वजस्तंभ आहे. याच्या जवळच एक तोफ काही हौशी दुर्गप्रेमींनी सिमेंटच्या चौथर्यात बसवलेली आहे. अशीच एक तोफ तुटलेल्या अवस्थेत लाक्ष्मीकोठीच्या समोर पडलेली आहे. ध्वजस्तंभाच्या उजवीकडे चालत गेल्यास लक्ष्मीकोठी आढळते.या कोठीत राहण्याची सोय होते. या कोठीत अनेक खोल्या आढळतात. दर्ग्याच्या पुढे थोडे उजवीकडे गेल्यास थोडा उंचावट्याचा भाग आहे, जिथे एक सुंदर शिवमंदिर आढळते.पुढे सरळ चालत गेल्यास एक छोटेसे तले आहे. हे तळ अष्टकोनी आहे. त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. हि गडावरील पिण्याच्या पाण्याची एकमेव सोय आहे. तिथून पुढे पंधरा ते वीस मिनिटे चालत गेल्यास एक मोठे तळे आढळते. नाना फडणविसांनी या तळ्याची बांधणी केली आहे. हे तळे सोळाकोणी आहे. मोठ्या तळ्याच्या पुढे विन्चुकाट्याकडे जाताना वाद्यांचे काही अवशेष दिसतात. लक्ष्मीकोठीच्या पश्चिमेस विन्चुकाटा आहे. या विन्चुकाट्यास बघून आठवण येते ती म्हणजे राजगडाच्या संजीवनी माचीची. पंदाराशे मीटर लांब आणि तीस मीटर रुंद अशी हि डोंगराची सोंड आहे. विन्चुकाट्यावर जाण्यासाठी एक टप्पा उतरून पलीकडे जावे लागते. गडावरून पहिले असता हा भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो, म्हणून यास विंचूकाटा म्हणतात. या भागात पाण्याची उत्तम सोय आढळते. गडाच्या आजूबाजूचा परिसर न्याहाळण्यासाठी या विंचूकाट्याचा उपयोग होत असावा. या गडावरून येतांना भाने गावातील भाजे लेण्या आवर्जून पहाव्यात. पावसाळ्यातील लोह्गादाचे रूप पहिले कि मनोन्मनी गुणगुणत ......!   
   

गडावर जाण्याच्या वाटा:-  लोहगडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत.   
१) पुण्यावरून अथवा मुंबईवरून येतांना लोणावळ्याच्या पुढे असलेल्या मळवली स्थानकावर उतरावे. तेथून एक्स्प्रेस हायवे पार करून भाजे गावातून थेट लोहगडला जाणारी वाट पकडावी.वाट मोठी प्रशस्थ आहे. तिथून दीड तास चालीनंतर 'गायमुख' येऊन पोहचतो. खिंडीच्या अलीकडे एक गाव आहे त्याचे नाव लोह्गाद्वादी. खिंडीतून उजवीकडे वळले म्हणजे लोहगडास पोहचतो आणि डावीकडे वळले म्हणजे विसापूर किल्यावर पोहचतो. या मार्गेलोहगडावर प्रवेश करतांना चार दरवाजे लागतात.   
२) लोनावल्यावरून दुचाकी अथवा चारचाकी वाहनाने थेट लोहगडवाडी पर्यंत जाता येते. पवना धरणाकडे जाणार्या रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर डावीकडे एक रस्ता लागतो तेथून ३ ते ४ कि.मी. अंतरावर लोहागाद्वादी आहे. उभा चढ आणि अतिशय धोकादायक वळणे आहेत. साधारण अर्ध्या तासाचा प्रवास आहे. मात्र येथे एसटी महामंडळाची सोय नाही. स्वतःचे वाहन असल्यास उत्तम अथवा लोणावळ्यातून trax ने जाता येते भाडे १००० रु आहे.   
३) काळे कॉलनी हि पवना धरणाजवळ वसलेली आहे. तेथून लोहगड आणि विसापूर मधील गायमुख खिंड परिसर व्यवस्थित दिसतो. पवना धरणाच्या खालून एक रस्ता गायमुख खिंडीच्या टेकडीवर जातो. तेथून एक मळलेली पायवाट आपणास लोहगडवाडीत घेऊन जाते.या टेकडीवर अग्रवाल नावाच्या इसमाचा बंगला आहे. या वाटेने किल्ल्यावर जाण्यास २ तास लागतात.   
   
राहण्याची सोय:- लक्ष्मी कोठी रहायची एकमेव सोय आहे. ३० ते ४० जन आरामात राहू शकतात.   
   
जेवण्याची सोय:- आपण स्वतः जेवणाची सोय करावी अथवा लोहगडवाडी मध्ये जेवणाची सोय होते.   
   
पाण्याची सोय:- बारमाही पिण्यासाठी पाणी उपलब्ध आहे.   
   
जाण्यासाठी लागणारा वेळ:- २ तास   


नोट : वरील सर्व माहिती "गडवाट" या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल . 


प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले तोरणा ।।

तोरणा किल्ला
किल्ल्याची उंची : १४०० मीटर
किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग
डोंगररांग : पुणे
जिल्हा : पुणे
श्रेणी : मध्यम

इतिहास:

शिवाजी महाराजांनी सुरवातीच्या काळात जे काही किल्ले घेतले त्यापैकी एक किल्ला तोरणा. गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव पडले तोरणा. महाराजांनी गडाची पाहणी करतांना याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे 'प्रचंडगड' असे नाव ठेवले. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत. यापैकी पहिल्या पदरावर तोरणा व राजगड वसलेले आहेत तर दुसऱ्या पदराला भुलेश्वर रांग म्हणतात. पुण्याच्या नैऋतेस असलेल्या पर्वतराजीमध्ये उत्तर अक्षांश व पूर्व रेखान्क्षावर हा किल्ला आहे. याच्या दक्षिणेस वेल्वंदी नदी व कानद नदीचे खोरे आहे. गडाच्या पश्चिमेला कानद व खरीव खिंडी आहेत. इतिहास : हा किल्ला कधी व कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषावरूनहा शैवपंथाचा आश्रम असावा. इ.स.१४७० ते १४८६ च्या दरम्यान बहामनी राजवटीसाठी मालिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला. नंतर तो महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंडगड असे ठेवले.गडावर काही इमारती बांधल्या. राजांनी आग्र्याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्नोधार केला; त्यात ५ हजार होण इतका खर्च त्यांनी तोरानावर केला. संभाजी महारांचा वध झाल्यावर हा किल्ला मुघलांनकडे गेला. शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. पुढे इ.स.१७०४ मध्ये औरंगजेबाने याला वेधा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतुउल्गेब म्हणजे दैवी विजय ठेवले. पण परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यात राहिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा महाराजांनी आपल्याकडेच ठेवला. विशेष म्हणजे औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला होय.

राहण्याची सोय : गडावरील मेंगाई देवीच्या मंदिरात १० ते १५ जणांची राहण्याची सोय होते.


जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही पाण्याची सोय : मेंगाई देवीच्या मंदिराच्या समोरच

बारमाही पाण्याचे टाके आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ : अडीच तास वेल्हे मार्गे, ६ तास राजगड - तोरणा मार्गे.


सूचना : गडावर जाण्याची वाट कठीण आहे.


नोट : वरील सर्व माहिती "गडवाट" या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .