Friday 29 March 2013

शिवरायांचे शिलेदार - रणझुंझार मुरारबाजी.

रणझुंझार मुरारबाजी
मुरारबाजी हे मराठा सैन्यातील वीर होते इ.स. १६६५ साली मुघलांनी घातलेल्या पुरंदराच्या वेढ्यात मराठा सैन्याचे नेतृत्व करत कणखर झुंज दिली. मात्र मुघलांनी केलेल्या सुलतान वेढ्याला प्रतिकार करताना ते मारले गेले .जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांशी झडलेल्या संघर्षात शिवाजीराजे भोसले यांना मोऱ्यांच्या सैन्यातून लढणाऱ्या मुरारबाजीच्या युध्द् कौशल्याचे विलक्षण कौतुक वाटले. स्वराज्य निर्मितीच्या लढ्यात अशा शूर मोहऱ्याचा उपयोग होईल हे जाणून जावळीच्या विजयानंतर शिवाजीराजांनी मुरारबाजीला मराठा साम्राज्याच्या सैन्यात दाखल करून घेतले. पुढे मुघल सरदार दिलेरखानाने इ.स. १६६५ साली घातलेल्या पुरंदराच्या वेढ्यात मुरारबाजीने गडावरील सैन्यास घेऊन किल्ला झुंजवायची शर्थ केली आणि त्यात ते अमर झाले.
ऐसा कायस्थ ब्राम्हण पुन्हा होणे नाही त्यांना मानाचा मुजरा...!!!

  ||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥

Thursday 28 March 2013

हिंदवी स्वराज संकल्पक : शहाजीराजे भोसले

पराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन, व स्वतंत्र राज्यकारभार या मूलभूत गुण-कौशल्यांचे बीजारोपण शिवाजीराजांमध्ये करणारे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व : शहाजीराजे भोसले.!!!

१८ मार्च १५९४ हा शहाजी महाराजांचा जन्म दिवस

शहाजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील. शहाजीराजे हे मातब्बर,कर्तबगार,पराक्रमी सरदार निजामशहीच्याच पदरी चाकरी करीत होते. शहाजीराजे प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते.मलिक अंबर ह्या निजामशहाच्या प्रभावी वजिराच्या मृत्यूनंतर मुघल सम्राटशहाजहानच्या सैन्याने इ.स. १६३६ मधे अहमदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रुजू झाले. आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली. महाराजांना राजकारभार, रणनीती आणि युद्धाभ्यास  ह्यांसबंधी प्राथमिक मार्गदर्शन त्यांना शहाजीराजांकडून मिळाले. 

जेव्हा दिल्लीमध्ये दिल्लीपती शहेनशाह शहाजान आणि महंमद आदिलशहा या दोघांनी मिळून निजामशाही संपवली, त्या वेळी निजामशहाचा वारसदार मूर्तझा या लहान मुलाला स्वत:च्या मांडीवर बसवून शहाजीराजांनी स्वतंत्रपणे राज्यकारभार सुरू केला, व जणू स्वत:वरच छत्र धारण केले. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील, संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावर घडली. त्यांचा हा स्वतंत्र राज्यकारभार जवळजवळ 3 वर्षे टिकला होता. या प्रसंगातून छत्रपती शिवाजी महाराजांची तल्लख बुद्धी, पराक्रम, रयतेचे पालनपोषण करण्याची जबाबदारीची भावना, चारित्र्य याप्रमाणेच स्वराज्यसंकल्पना हे सर्व घटक आनुवंशिकतेने शहाजीराजांकडून त्यांच्या अंगी आले होते असे निश्र्चितपणे म्हणता येते.

फार वर्षांपूर्वी राजस्थानच्या चितोडगडच्या संग्रामात अल्लाउद्दीन खिलजीशी लढताना राणा लक्ष्मणसिंह नावाचा सेनानी आपल्या सात मुलांसह धारातीर्थी पडला. पुढे याच वंशातील भैरोसिंह उर्फ भोसाजी महान कार्य करून गेले. त्यांच्यामुळेच या वंशाला पुढे ‘भोसले’ हे नाव प्राप्त झाले. याच वंशात पुढे वेरुळस्थित बाबाजीराजे भोसल्यांच्या घरात मालोजीराजे भोसले आणि उमाबाई यांच्या पोटी शहाजीराजे यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्री उमाबाईंनी अहमदनगरजवळील शहाशरीफ पीराला नवस बोलल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवली. पुढे सिंदखेडराजा येथील लखुजीराव जाधव यांच्या मुलीशी म्हणजेच जिजाबाईंशी शहाजीराजे यांचा 1603 साली विवाह झाला. या वेळी लखुजीराव व मालोजीराजे हे दोघेही निजामशाहीत होते. पुढे लगेचच मालोजीराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कालांतराने जसेजसे शहाजीराजे मोठे होत गेले, तसतशी पराक्रम, राजकारण, मुत्सद्देगिरी या बाबतीत त्यांची कीर्ती वाढत सर्वदूर पसरत गेली.

दरम्यान अहमदनगरजवळील भातवडीच्या रणांगणात निजामशाही संपवण्यासाठी भारतवर्षातील सर्व इतर सत्ता एकत्र आल्या होत्या. निजामशाही वाचवण्यासाठी या एकत्रित फौजांचा सामना शहाजीराजे वजीर मलिक अंबरच्या साथीने करीत होते (इ. स. 1624). त्यांना त्यात यश मिळाले. शहाजीराजांचा ऐतिहासिक विजय झाला. याच लढाईत शहाजीराजांचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले. पण पुढे मलिक अंबरची दरबारातील राजकारणी वागणूक पाहून शहाजीराजे आदिलशाहीत गेले. त्यानंतर 1639 साली आदिलशहाकडून सरलष्कर ही पदवी त्यांना देण्यात आली व बंगळूरची जहागिरीही त्यांना प्राप्त झाली. आदिलशाहीत असताना शहाजीराजांनी पुणे परगणा निजामशाहीकडून काबीज केला होता.

शहाजीराजांना बंगळूरचा प्रदेश फार आवडला. शहाजीराजे व त्यांचे थोरले चिरंजीव संभाजीराजे यांनी आपल्या मनातील स्वराज्य संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचे या ठिकाणी ठरविले. ते मुळातच उत्तम प्रशासक व पराक्रमी योद्धे होते. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी बरीच अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली होती. छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणूनच त्यांनी योग्य वेळ पाहून पुण्यात आपल्या जहागिरीवर स्वतंत्र कारभार चालविण्यासाठी पाठवले होते. त्याचबरोबर श्यामराज रांझेकर, बाळकृष्णपंत हणमंते, रघुनाथ बल्लाळ अत्रे, कान्होजी जेधे नाईक व यांच्याबरोबर इतर अनेक मातब्बरांना जय्यत तयारीनिशी शिवाजी महाराजांसोबत राज्यकारभारासाठी पाठवले होते. राज्यकारभारासाठीची आवश्यक राजमुद्राही शहाजीराजांनीच शिवरायांना दिली.

दरम्यानच्या काळात आदिलशहाचा मुख्य वजीर नवाब मुस्तफाखान याने बाजी घोरपडे, मंबाजी भोसले, मंबाजी पवार, बाळाजी हैबतराव, फतहखान, आझमखान यांच्या साहाय्याने शहाजीराजांना दगा देऊन कर्नाटकातील जिंजीजवळ कैद केले. साखळदंडांनी बांधून भर विजापुरातून शहाजीराजांना दरबारात हजर करण्यात आले. तो दिवस होता 25 जुलै, 1648 चा. हे कळताच शिवाजी महाराजांनी मुत्सद्दीपणाने राजकारण करत दिल्लीत मोगल सुलतान शहाजहानला एक पत्र पाठवले. स्वत: आपण व आपले पिता शहाजीराजे हे दिल्लीपतीची चाकरी करू इच्छितात असे त्यांनी लिहिले. या बदल्यात शहाजीराजांची विजापूरच्या कैदेतून मुक्तता करावी ही अट घातली. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी दिल्लीच्या बादशहाला मधाचे बोट लावले होते. हा प्रयत्न यशस्वी ठरला. शहाजीराजांची दि. 16 मे, 1649 रोजी सन्मानपूर्वक सुटका झाली.

शहाजीराजांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला असता असे लक्षात येते की त्यांनी स्वाभिमान राखत आदिलशाही, मुघलशाही व निजामशाही - या सर्व सत्ताधीशांकडे काम केले. त्यांच्या कारकीर्दीचे महत्त्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे,

* इ. स. 1625 ते 1628 - आदिलशाही
* इ. स. 1628 ते 1629 - निजामशाही
* इ. स. 1630 ते 1633 - मुघलशाही
* इ.स. 1633 ते 1636 - निजामशाही
* इ.स. 1636 पासून पुढे - आदिलशाही


अरू उत्तर दछन रछन को इत ।
साहजु है उत साहिजहाँ ।।
-याचा अर्थ असा की उत्तरेकडील प्रदेशाचे रक्षण करण्यास शहाजहाँ आणि दक्षिणेचे रक्षण करण्यास शहाजी आहे.

 ||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥

Monday 11 March 2013

११ मार्च १६८९ इतिहासातील काळाकुट्ट दिवस......

आजचा दुःखाचा दिवस आहे , मन बैचेन करणारा आणि उदास वाटणारा दिवस आहे.......
- एकदाही पराभव न पत्करणारे, एकदाही माघार नाही, एकदाही तह नाही, सर्वच्या सर्व लढाया जिंकणारेहिंदवी मराठा स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर शंभूराजे यांचा बलिदान (स्मृतिदिन) दिन...!!!  
आजही विसलो नाही तुमची ती क्रुर धिंड,
 कस काय राजे तुम्ही एवढ सहण केलय,
 कैद झाला छावा पण स्वाभीमान कैद नव्हता,
ऊभा होता समोर औरंग्याच्या पण नजरेला नजर देत होतात ...
कातड आंगावरच त्यांनी सोलुनही आबासाहेबांचा शब्द तुम्ही जिवापाड जपलाय,
 "" आबासाहेब जोपर्यंत ह्या संभाजीच्या प्राणामद्धे प्राण आहे ना - तोपर्यंत तुम्ही कमावलेला एकही किल्ला तुमच्यापश्चात हा संभाजी मोगलांच्या हातात जाऊ देणार नाही...!! ""
्वतः खूप वेदना सहन केल्या पण आबासाहेबांना दिलेलं वचन शेवटपर्यंत सत्य करून दाखवला...!!
 आज तुम्ही राजे त्या मृत्युलाही हरवलय.....
मृत्यूला घाबरणारे अनेक पाहिले ,
मृत्यूला न घाबरणारे हि अनेक पाहिले ,
पण मृत्यूला घाबरविणारा मी ऐकच पाहिला........
फक्त ....
!! मृत्युंजय छत्रपती शंभूराजा !!
!! सिंहाच्या जबड्यात घालूनी हात मोजितो दात हि जात मराठ्यांची !!

" जगावे तर छत्रपती शिवराय यांच्या सारखे आणि मरावे तर छत्रपती संभाजीराज्यासारखे". 
 
 महापराक्रमी, रणवीर, मृत्युंजय, धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांच्या चरणी शतवार मुजरा !!!
 ||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥
 

Friday 1 March 2013

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले चौल्हेर ।।

चौल्हेर किल्ला

किल्ले चौल्हेर हा चौरगड उर्फ तिळवणचा किल्ला अथवा चाल्हेरीचा किल्ला य़ा नावाने देखील ओळखला जातो. किल्ले चौल्हेर हा साल्हेरचा जुळा भाऊ आहे. साल्हेर महाराष्ट्रातील सर्वात उंच गड आहे. चौरगड चौल्हेरचा आकार हा साधारणपणे साल्हेरशी साधर्म्य दाखविणारा आहे.

इतिहास :
येथे दरवर्षी पोळ्याच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे पिठुरी अमावस्येला जत्रा भरते..गडावर मोती टाके, शेवाळ्या टाके, हत्यार्‍या टाके, खेकड्या टाके आहे या गावाला आधी मोठा कोट होता येथे गवळी राजा राज्य करीत असे त्याच काळातील एक घोडपागा वाडीचौल्हेर मध्ये आजही पहावयास मिळते या राजाच्या हाताखाली काही हजारी (उदा पंचहजारी इ) काही मन्सबदार होते यातील एक मन्सबदार पुढे देखील या परिसराची देखभाल करत असे

गडावरील
पहाण्याची ठिकाणे :
गडावर शिरतांनाच एक भुयारी दरवाजांची रांगची रांग लागते. गडावर शिरण्यासाठी ३ दरवाज्यातून आत जावे लागते. हे दरवाजे म्हणजे स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ठ नमुनाच होय. गडावर शिरल्यावर समोरच बालेकिल्ला आहे. तर डावीकडे गडाची छोटीशी माची आहे. गडाच्या माचीवर पाण्याचे एक मोठे तळे आहे. तर शेवटच्या टोकाला तटबंदीचे काही अवशेष आहेत. माचीवर फेरफटका मारुन बालेकिल्याची वाट धरावी.
बालेकिल्ल्याला जाण्यासाठी दोन्ही बाजुंनी वाटा आहेत. उजवीकडच्या वाटेने १० मिनिटात पायर्‍यांच्या साह्याने गडावर पोहचता येते. वाटेत मोतीटाके, आणि अनेक पाण्याची कातळात खोदलेली टाकी आढळतात. मोती टाक्यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. बालेकिल्यावर सुध्दा पाण्याची ४ जोड टाकी आढळतात. याशिवाय पडक्या वाड्यांचे काही अवशेष आहेत. बालेकिल्यावरुन संपूर्ण गडाचा घेरा लक्षात येतो. गडावरुन सातमाळ रांग व सेलबारी - डोलबारी रांगेचे मोहक दर्शन होते. बालेकिल्याकडे जाणार्‍या डावीकडच्या वाटेवर चौरंगनाथाची व हनुमाना्ची मुर्ती आहे. त्यावर सध्या गावकर्‍यांनी एक पत्र्याची शेड उभारली आहे. येथे दरवर्षी पोळ्याच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे पिठुरी अमावस्येला जत्रा भरते..पुढे गेल्यावर कातळात खोदलेली पाण्याची मोती टाके, शेवाळ्या टाके, हत्यार्‍या टाके, खेकड्या टाकी लागतात. संपूर्ण गड फिरण्यास दोन तास पुरतात.
वाडी चौल्हेर या गावाला आधी मोठा कोट होता. येथे गवळी राजा राज्य करीत असे. त्याच काळातील एक घोडपागा वाडीचौल्हेर मध्ये आजही पहावयास मिळते.

गडावर जाण्याची वाट: 
नाशिक मार्गे ९५ किमी वरील सटाणा गाठावे. सटाण्यावरुन तिळवणला जाणारी एसटी पकडावी. तिळवण पासून २० मिनिटांवर असणार्‍या वाडी चौल्हेर गावात पोहचावे. वाडी चौल्हेर हे पायथ्याचे गाव. गावातच किल्ल्यावरुन उतरणारी एक डोंगरसोंड आहे. याच डोंगरसोंडेवरुन चालत दीड तासात गडमाथा गाटत यतो.

राहण्याची सोय : गडावर राहण्याची सोय नाही. 
पाण्याची व जेवणाची व्यवस्था : गडावर पाण्याची व जेवणाची व्यवस्था नाही, आपण स्वत: करावी. 


नोट : वरील सर्व माहिती काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .