Friday 2 August 2013

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले रांजणगिरी ।।

रांजणगिरी किल्ला

किल्ल्याची ऊंची : २७९० मी.
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग.
 डोंगररांग: त्र्यंबकेश्वर.
श्रेणी : मध्यम .
जिल्हा : नाशिक.

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर रांगेत रांजणगिरी हा किल्ला आहे. नाशिक शहर हे प्राचिन काळापासून मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिध्द होते. डहाणू बंदरात उतरलेला माल जव्हार - गोंडाघाट - अंबोली घाट या मार्गे नाशिकला येत असे. या व्यापारीमार्गाचे रक्षण करण्यासाठी जव्हार जवळ भूपतगड तर घाटमाथ्यावर त्र्यंबकगड, बसगड(भास्करगड), हर्षगड, रांजणगिरी, अंजनेरी या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली.
रांजणगिरीच्या दक्षिण टोकाला असलेल्या सुळक्याचा आकार रांजणासारखा असल्यामुळे या किल्ल्याला "रांजणगिरी" हे नाव पडले असावे.

गडावरील पहाण्याची ठिकाणे :
या किल्ल्याचे प्रवेशद्वार, तटबंदी, बुरुज आज अस्तित्वात नाहीत. आडव्या पसरलेल्या या गडावर पाण्याची दोन टाकं आहेत. गडावर प्रवेश करण्यापूर्वी रांजणासारख्या वैशिष्ट्यपूर्ण आकार असलेल्या सुळक्याला वळसा घालून जावे लागते. प्रस्तरारोहणाचे प्राथमिक तंत्र वापरुन हा सुळका सर करता येतो.
 
गडावर पोहोचण्याच्या वाटा:
मुंबई - नाशिक महामार्गावर नाशिकच्या अलिकडे १५ किमी वर मुळेगावकडे जाणारा रस्ता लागतो. मुळेगाव हे रांजणगिरीच्या पायथ्याचे गाव आहे. डोंगराच्या सोंडेवरुन साधारण १ तासात किल्ल्यावर जाता येते.

राहाण्याची सोय : गडावर रहाण्याची सोय नाही.

जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही.


पाण्याची सोय : गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.


गडावर जाण्यासाठी लागणारा वेळ : मुळेगावातून गडावर जाण्यास एक तास लागतो. 

 ||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥


नोट : वरील सर्व माहिती " महाराष्ट्रातील किल्ले "  या facebook  वरील पेज मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल . 

प्रवास एका शिवभक्ताचा :- || किल्ले रसाळगड ||

रसाळगड
किल्ल्याची ऊंची : १७७० मी .
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग .
डोंगररांग : रत्नागिरी ,कोकण.
 श्रेणी : मध्यम.
जिल्हा : रत्नागिरी.

सह्याद्रीची रांग उत्तर-दक्षिण पसरलेली आहे. मुख्य रांगेपासून सुटावलेल्या अनेक रांगा पाच पंचवीस मैल लांबवर पसरलेल्या आहेत. पोलादपूर सोडून खेडवरून चिपळूणकडे जाताना रसाळगड, सुमारगड, महिपतगड हे तीन दुर्ग आपले लक्ष वेधून घेतात. हे सर्व किल्ले जावळीच्या खोर्‍यातच येतात. प्रतापगड, मधुमकरंद गड, रसाळगड, सुमारगड आणि महिपतगड हा ट्रेकही खूप प्रसिद्ध आहे.

गडावरील पहाण्याची ठिकाणे :
रसाळगडाचा घेरा लहानच असल्याने संपूर्ण गडफेरीस एक ते दीड तास लागतो. रसाळवाडीतून किल्ल्यावर शिरतानाच वाटेत दोन दरवाजे लागतात. पहिल्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोरच तटातील मारुतीचे दर्शन होते. वळसा मारून आपण किल्ल्याच्या दुसर्‍या दरवाजात पोहोचतो. या दरवाजातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच तटावर एक भली मोठी तोफ दिसते. तोफा हे या किल्ल्यांचे मोठे वैशिष्ट्यच आहे. किल्ल्यावर लहानमोठ्या मिळून सुमारे १६ तोफा आहेत.
संपूर्ण किल्ल्याचा माथा म्हणजे एक पठारच होय समोरच झोलाई देवीचे मंदिर आहे. मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. कोनाड्यात अनेक सापडलेल्या मूर्त्या ठेवल्या आहेत. मंदिराच्या समोर दीपमाळ आणि तुळशी वृंदावन आहे. समोरच एक तोफ सुद्धा ठेवलेली आहे. मंदिराच्या बाजूला पाण्याचा मोठा तलाव आहे. हे पाणी पिण्यासाठी योग्य आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला शिवाचे छोटेसे मंदिर आहे. पाण्याच्या टाक्याच्या वरच्या भागाला थोडासा उंचवटा आहे , यालाच बालेकिल्ला म्हणतात. यात वाड्यांचे मोठ्या प्रमाणावर अवशेष आहेत. बुरूजावर तोफा आढळतात. येथून समोरच एक दगडी बांधकाम असलेली खोली आढळते. हे धान्य
कोठार असावे असे वाटते. बालेकिल्ल्याच्या जवळच आणखी एक पाण्याचा तलाव आहे. या दोन्ही तलावात बारामही पाणी असते. किल्ल्याच्या नैऋत्य भागात एक नंदी आहे. मात्र येथे शिवाची पिंड आढळत नाही. किल्ल्यावर पाण्याची टाकी मोठ्या प्रमाणावर आहेत, म्हणजे हा किल्ला पूर्वी मोठ्या प्रमाणावर नांदता असावा.

गडावर  पोहोचण्याच्या वाटा :

१) वाडीबीड गावातून :-
खेड वरून वडगाव बिरमणी कडे जाणारी बस पकडायची आणि वाटेत असणार्‍या हुंबरी फाट्यावर उतरायचे. हुंबरी फाट्यापासून थेट बीड गावात जाणारी वाट पकडायची. साधारणत: बीड गावात पोहोचण्यास एक तास लागतो. वाडीबीड गावातून गडावर जाण्यास मळलेली वाट आहे. या मार्गाने किल्ल्यावर पोहचण्यास दीड तास लागतो.
) रसाळवाडी मार्गे:-
खेड वरून निमनी गावात जाण्यासाठी बसेस सुटतात. निमनी गावात उतरून एका तासात रसाळवाडी मार्गे किल्ला गाठता येतो. वाट अत्यंत सोपी आहे.
) मौजे जैतापूरहून - रसाळवाडी मार्गे :-
खेड वरून मौजे जैतापूर गावात जाणारी एस टी पकडावी. मौजे जैतापूरहून रसाळवाडी मार्गे दोन तासात रसाळगड गाठावा. वाट अत्यंत सोपी आहे.

गडावर राहाण्याची सोय : झोलाई देवीच्या मंदिरात ३० ते ४० माणसे राहू शकतात.

जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही, आपण स्वत करावी

पाण्याची सोय : गडावर पिण्याचे पाणी बारामही उपलब्ध आहे.

गडावर  जाण्यासाठी लागणारा वेळ :
रसाळवाडीतून गडावर जाण्यास १ तास लागतो.


 नोट : वरील सर्व माहिती "  शिवकालीन महाराष्ट्र' "  या facebook  वरील पेज मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .  

प्रवास एका शिवभक्ताचा :- || किल्ले राजधेर ||

राजधेर  किल्ला

 किल्ल्याची ऊंची : ३५५५ मी.
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग.
 डोंगररांग : अजंठा सातमाळ.
 श्रेणी : मध्यम.
जिल्हा : नाशिक .

नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीची एक रांग सुरगणा पासून चालू होते आणि चांदवड पर्यंत येऊन संपते. पुढे तीच मनमाडच्या जवळ असणार्‍या अंकाईच्या पर्यंत जाते. याच रांगेला अजंठा - सातमाळ रांग म्हणतात. चांदवड तालुक्यात राजधेर,कोळधेर,इंद्राई आणि चांदवड हे ४ किल्ले येतात.

गडावरील पहाण्याची ठिकाणे :
राजधेर किल्ल्यावर प्रवेश करतांना पहिल्या प्रवेशद्वाराच्या डावीकडच्या कमानीवर एक फारसीतील शिलालेख आहे. येथून गडमाथ्यावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायर्‍या लागतात. गडमाथ्यावर पोहोचल्यावर समोरच दोन वाटा फुटतात. एक डावीकडे जाणारी तर दुसरी उजवीकडे जाणारी. आपण उजवीकडची वाट पकडायची , थोडे पुढे गेल्यावर एक वाडा लागतो. आजही वाडा चांगल्या स्थितीत उभा आहे. या वाड्या शिवाय येथे बघण्यासारखे काही नाही. परत फिरून आता डावीकडची वाट पकडायची. या वाटेवरून थोडे पुढे गेल्यावर एक कातळात खोदलेली गुहा लागते. या गुहेत उतरण्यासाठी एक शिडी लावलेली आहे. येथे सध्या एका बाबांचे वास्तव्य असते. गुहेच्या वरच्या भागावर एक घुमटाकार कमान असलेली विहीर आहे. येथून परत थोडे पुढे गेल्यावर आणखी एक गुहा लागते. या गुहे समोरून पुढे जाणारी वाट तलावापाशी घेऊन जाते. तलावाच्या काठावर एका गुहेत महादेवाचे मंदिर आहे. तलावाच्या कडेकडेने जाणार्‍या वाटेने आपण डोंगरमाथ्यावर पोहोचतो. वाटेत अनेक भुयारी टाकी आढळतात. गडाच्या सर्वोच्च माथ्यावर एक तलावआहे. गडमाथ्यावरुन मांगीतुंगी, न्हावीगड ,कोळधेर ,इंद्राई, धोडप असा सर्व परिसर दिसतो. गडमाथा फिरण्यास २ तास लागतात. उतरण्यासाठी एक शिडी लावलेली आहे.
 
गडावर पोहोचण्याच्या वाटा :
राजधेरवाडी मार्गे :-
राजधेरवर जाण्यासाठी एकच मार्ग आहे. नाशिक किंवा मनमाड मार्गे चांदवड गाठावे. नाशिक पासून चांदवड ६४ किमी वर आहे, तर मनमाड पासून चांदवड २४ किमी वर आहे. चांदवड मधून एसटी ने राजधेरवाडी गाठावी. राजधेरवाडी हे पायथ्याचे गाव आहे. राजधेरवाडीतून गडावर जाण्यास ठळक वाट आहे. गावातून किल्ल्यावर जातांना आपण एका कातळकड्यापाशी पोहोचतो. येथून वर जाण्याच्या पायर्‍या तुटलेल्या आहेत. पण सध्या तिथे एक शिडी लावली असल्यामुळे आपण गडाच्या प्रवेशद्वारात पोहोचू शकतो. अन्यथा प्रवेशद्वारा पर्यंत पोहोचण्यासाठी प्रस्तरारोहण करावे लागते. राजधेरवाडीतून इथपर्यंत पोहोचण्यास दीड तास लागतो.

गडावर राहाण्याची सोय : किल्ल्यावर राहण्यासाठी गुहा आहे. यात १० लोकांची राहण्याची सोय होते.

जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय आपण स्वत: करावी.

पाण्याची सोय :किल्ल्यावर बारामही पिण्याचे पाण्याची टाकी आहेत.

गडावर जाण्यासाठी लागणारा वेळ : राजधेरवाडी गावातून दीड तास लागतो.


 नोट : वरील सर्व माहिती "  शिवकालीन महाराष्ट्र' "  या facebook  वरील पेज मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .