Friday 30 November 2012

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले अजिंक्यतारा ।।


अजिंक्यतारा किल्ला

किल्ल्याची ऊंची : 950
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: बामणोली, सातारा 
जिल्हा : सातारा 
श्रेणी : मध्यम

अजिंक्यतारा हा किल्ला सत्पर्षी, सातारचा किल्ला म्हणून देखील ओळखला जातो. अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी सातारा शहर वसलेले आहे. गडावरून सातारा शहराचे विहंगम दृश्य दिसते. प्रतापगडापासून फुटणार्या बामणोली रांगेवर अजिंक्यतारा उभारलेला आहे. गडावरुन पूर्वेला नांदगिरी, चंदन-वंदन हे किल्ले आणि पश्चिमेला सज्जनगड दिसतो.

इतिहास : 
 सातारचा किल्ला (अजिंक्यतारा) म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी. पहिली राजगड मग रायगड,
जिंजी आणि चौथी अजिंक्यतारा. सातार्याचा किल्ला हा शिलाहार वंशीय भोज(दुसरा) याने इ.स. ११९० मध्ये बांधला. पुढे हा किल्ला बहामनी सत्तेकडे आणि मग विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. इ.स. १५८० मध्ये पहिल्या आदिलशहाची पत्नी चांदबिबी येथे कैदेत होती. बजाजी निंबाळकर सुद्धा या ठिकाणी तुरुंगात होते. शिवराज्याचा विस्तार होत असतांना २७ जुलै १६७३ मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला. या किल्ल्यावर शिवरायांना अंगी ज्वर आल्याने दोन महिने विश्रांती घ्यावी लागली. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर १६८२ मध्ये औरंगजेब महाराष्ट्रात शिरला. इ.स. १६९९ मध्ये औरंगजेबाने सातार्याच्या दुर्गाला वेढा घातला. त्यावेळी गडावरचा किल्लेदार प्रयागजी प्रभू होते. १३ एप्रिल १७०० च्या पहाटे मोगलांनी सुरंग लावण्यासाठी दोन भुयारे खणली आणि बत्ती देताच क्षणभरातच मंगळाईचा बुरूज आकाशात भिरकावला गेला. तटावरील काही मराठे दगावले. प्रयागजी प्रभू देखील या स्फोटात सापडले, मात्र काहीही इजा न होता ते वाचले. तेवढ्यातच दुसरा स्फोट झाला. त्यामुळे मोठा तट पुढे घुसणार्या मोगलांवर ढासळला व दीड हजार मोगल सैन्य मारले गेले. किल्ल्यावरील सर्व दाणागोटा व दारूगोळा संपला आणि २१ एप्रिल रोजी किल्ला सुभानजीने जिंकून घेतला. किल्ल्यावर मोगली निशाण फडकण्यास तब्बल साडेचार महिने लागले. किल्ल्याचे नामकरण झाले आझमतारा. ताराराणीच्या सैन्याने पुन्हा किल्ला जिंकला व त्याचे नामातंर केले अजिंक्यतारा ! पण ताराराणीला काही हा किल्ला लाभला नाही. पुन्हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन झाला मात्र १७०८ मध्ये शाहुने फितवून किल्ला घेतला आणि स्वत:स राज्याभिषेक करून घेतला. इ.स. १७१९ मध्ये महाराजांच्या मातोश्री येसूबाई यांना किल्ल्यावर आणण्यात आले. पुढे पेशव्याकडे हा किल्ला गेला. दुसर्या शाहुच्या निधनानंतरm फितुरीमुळे किल्ला ११ फेब्रुवारी १८१८ मध्ये इग्रजांकडे गेला.

गडावर पहाण्याची ठिकाणे : सातार्यातून ज्या मार्गाने आपण गडावर प्रवेश करतो त्यामार्गावर दोन दरवाजे आहेत. आजही या दोन दरवाजांपैकी पहिला दरवाजा सुस्थितीत आ.हे दरवाजाचे दोन्ही बुरूज अस्तित्वात आहेत. दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे हनुमानाचे मंदिर आहे. हे मंदिर राहण्यास उत्तम आहे.  दरवाजातून आत शिरल्यावर डावीकडील सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर वाटेत महादेवाचे मंदिर लागते. समोर प्रसारभारती केंद्राचे कार्यालय व मागे दोन प्रसार भारती केंद्राचे टॉवर्स आहेत. पुढे गेल्यावर एक डावीकडे जाणारी वाट दिसते व " मंगळादेवी मंदिराकडे "असे तिथे
लिहिलेले आढळते. या वाटेत ताराबाईंचा ढासाळलेला राजवाडा आहे . येथे एक कोठारही आहे. वाटेच्या शेवटी मंगळादेवीचे मंदिर लागते. मंदिराच्या समोरच मंगळाईचा बुरूज आहे. मंदिराच्याआवारात अनेक शिल्प आढळतात. या वाटेने थेट तटबंदीच्या साह्याने पुढे जाणे म्हणजेगडाला प्रदक्षिणा घालण्यासारखेच आहे. गडाच्या दक्षिणेला देखील दोन दरवाजे आहेत. तटबंदीवरून प्रदक्षिणा मारतांना ते नजरेस पडतात. या दरवाजात येणारी वाट सातारा-कराड हमरस्त्यावरून येते. दरवाजापाशी पाण्याचे तीन तलाव आहेत. उन्हाळ्यात मात्र तलावांत पाणी नसते. गडाला प्रदक्षिणा घालून आल्या मार्गाने खाली उतरावे लागते. किल्ल्यावरून समोरच यवतेश्वराचे पठार, चंदनवंदन किल्ले, कल्याणगड, जरंडा आणि सज्जनगड हा परिसर दिसतो. संपूर्ण गड बघण्यासाठी साधारणत दीड तासलागतो. 

गडावर पोहोचण्याच्या वाटा : सातार्यापासून साधारणत: १ तास लागतो. अजिंक्यतारा किल्ला सातारा शहरातच असल्याने शहरातून अनेक वाटांनी गडावर जाता. येते सातारा एस टी स्थानकावरून अदालत वाड्या मार्गे जाणारी कोणतीही गाडी पकडावी आणि अदालत वाड्यापाशी उतरावे. सातारा ते राजवाडा अशी बससेवा दर १० ते १५ मिनिटाला उपलब्ध आहे. राजवाडा बस स्थानकापासून अदालत वाड्यापर्यंत येण्यास १० मिनिटे लागतात. अदालत वाड्याच्या बाजूने जाणार्या थेट वाटेने आपण गडावर जाणार्या गाडी रस्त्याला लागतो. येथून गाडी रस्त्याने १ किमी चालत गेल्यावर आपण थेट गडाच्या प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. अजिंक्यतारा किल्ल्यावर जाण्यासाठी थेट गाडी रस्ता सुद्धा आहे. या रस्त्याने आपण किल्ल्याच्या दरवाजापाशी पोहोचतो. कोणत्याही मार्गे गड गाठण्यास साधारण १ तास लागतो.

राहाण्याची सोय : गडावरील हनुमानाच्या मंदिरात १० ते १५ जणं राहू शकतात. 

जेवणाची सोय व  पाण्याची सोय : आपण स्वत: करावी.

 ||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥

 
 नोट : वरील सर्व माहिती || महाराष्ट्रातील किल्ले || या facebook मधील  ( -by Sumit Bhaskar Jagtap )एका पोस्टचा  संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

No comments:

Post a Comment