Monday 1 April 2013

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले चावंड ।।

 चावंड किल्ला

किल्ल्याची उंची: 3400 फूट
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांगः सह्याद्री नाणेघाटा  
जिल्हा: जुन्नर, पुणे
 श्रेणी: मध्यम 

 जुन्नर तालुक्यामध्ये नाणेघाटाचे पहारेकरी म्हणून नावलौकिक मिळवलेले किल्ले म्हणजे जीवधन, चावंड, हडसर आणि शिवनेरी. यांपैकी चावंड जुन्नर शहरापासून तासाभराच्या अंतरावर असलेल्या आपटाळे गावानजीक आहे. गडाच्या पायथ्याशी चावंड गाव वसलेले आहे. नाणेघाटापासून जुन्नरच्या दिशेने १५ कि.मी च्या आसपास चावंड वसलेला आहे. चावंड गावात आणि आजुबाजूच्या गावांमध्ये महादेवकोळ्यांची वस्ती आहे.

 इतिहास :
१) सन १४८५ मध्ये अहमदनगरच्या निजामशाहीची स्थापना करणार्‍या मलिक अहमदला पुणे प्रांतातले जे किल्ले मिळाले, त्यामधे चावंडचे नाव आहे. बहमनी साम्राज्याचे जे तुकडे झाले, त्यात त्याला उत्तर कोकण व पुणे प्रांत मिळाले.
२) दुसरा बुह्राण निजामशाह (इस १५९०-१५९४) हा सातव्या निजामाचा नातू . बहादुरशाह १५९४ साली चावंडला कैदेत होता.
३) १६३६ मध्ये निजामशाहीचा आदिलशाह आणि मोगलांपासून बचाव करण्यासाठी शहाजीराजांनी जो तह केला, त्यानुसार चावंड मोगलांना मिळाला.
४) मे १६७२ पर्णाल पर्वत ग्रहणाख्यानात कवी जयराम पिंडे म्हणतो की,. त्याचप्रमाणे चामुंडगड, हरिश्चंद्रगड, महिषगड आणि अडसरगड हे किल्ले महाराजांच्या मावळ्यांनी जिकिरीने लढून घेतले. महाराजांनी याचे नाव प्रसन्नगड असे ठेवले.
५) या गडाची अनेक नावे अशाप्रकारे आहेत; चामुंड, चाऊंड, चावंड ही नावे चामुंडा या शब्दाचा अपभ्रंश आहेततर प्रसन्नगड हे शिवाजी महाराजांनी ठेवलेले नाव  आहे.
मलिक अहमदने शिवनेरी जिंकल्यावर आपल्या एका सरदाराच्या हाती हा किल्ला दिला. या किल्ल्यातही भरपूर लूट त्याच्या हाती आली. जोंड किल्ल्याचीही व्यवस्था आपल्या एका सरदाराच्या हाती सोपवून त्याने लोहगडाकडे आपला मोर्चा वळवला.

गडावर पहाण्याची ठिकाणे : 
गडमाथा गाठण्यासाठी गडाच्या पश्चिमेकडूनच वाट आहे. चावंडवाडीतील आश्रमशाळेपासून गड चढण्यास चांगली मळलेली पायवाट आहे. या वाटेने साधारण अर्धातास चढल्यानंतर आपण खडकात खोदलेल्या पायर्‍यांच्या समांतर रेषेत चालतो. ( प्रचलित दंतकथेनुसार ते गडावर पोहोचवणारे गुप्त भुयार असावे.) साधारण १५ पायर्‍या चढून गेल्यावर आपणास एक मन खिन्न करणारी गोष्ट जाणवते. पूर्वी कोणा अनामिकाने या पायर्‍या चढण्यासाठी आधार म्हणून एका छोट्या तोफेची नळी जमिनीत पुरली आहे. साधारण २ इंच अंतर्गत व्यास असलेली ही तोफ २ ते २.५ फूट लांबीची आहे.जमिनीच्या वर असलेला हा भाग साधारण दोन तृतियांश आहे. या तोफेची लांबी साधारण ३ ते ३.५ फूट असावी. या तोफेला जंबुरका म्हणतात.
या पायर्‍या अगदीच छोट्या आहेत. इंग्रजांनी १ मे १८१८ रोजी चावंडवर हल्ला करून येथील पायर्‍या उद्‌ध्वस्त करून टाकण्याचा प्रयत्न केला. तशा सुरुंग लावल्याच्या खुणाही आपल्याला पायर्‍या चढताना दिसतात. यानंतर २०-२५ पायर्‍या चढून गेल्यावर आपल्याला प्रवेशद्वाराची तटबंदी पूर्णपणे सामोरी येते. येथे ३ मी. लांबीच्या प्रशस्त पायर्‍या आहेत, ज्यावर आज रानगवत माजलेले आहे. वर चढून गेल्यावर प्रथमदर्शनी नजरेस पडते ती कातळकोरीव गणेशप्रतिमा, आणि नैऋत्यमुखी प्रवेशद्वार. या प्रवेशद्वारावरही एक गणपती कोरलेला आहे. यावरून असे कळते की पेशवे काळातही या गडावर बराच राबता असावा. दरवाजाची उजवी बाजू म्हणजे एक अखंड कातळ आहे. उजवा स्तंभही याच कातळातून कोरलेला आहे. गडावरची हीच वास्तू अबाधित राहिली आहे. दरवाजाजवळच एक उखळ पडले आहे. दरवाजातून आत जाताच, दहा पायर्‍या चढून गेल्यावर दोन वाटा लागतात. वरची उजवीकडची वाट उद्‌ध्वस्त अवशेषांकडे घेऊन जाते, तर डावीकडे तटबंदीच्या बाजूने जाणारी वाट आहे. उजव्या बाजूस कातळात कोरलेल्या १५ - २० पायर्‍या चढून गेल्यावर, काही वास्तू नजरेत येतात. एका वास्तूचा चौथरा अजून व्यवस्थित आहे. इथे आपल्याला अशा बर्‍याच वास्तू दिसतातजवळ (जवळ १५ ते २० वास्तूंचे अवषेश इथे आहेत) , म्हणून असा निष्कर्ष काढता येइल की इथे मोठी वस्ती असावी.आजुबाजुच्या परीसराचा मुलकी कारभार या गडावरुन चालत असावा.जेथे चौथरा शिल्लक आहे, तेथेच मोठे गोल उखळ आहे. मात्र त्यास खालच्या बाजूला एक छिद्र आहे. बाजूलाच २ संलग्न अशी टाकी आहेत. येथून उत्तरेस थोडे पुढे गेलो की एक खचत चाललेली वास्तू नजरेस पडते. हिच्या बांधकामावरून असे प्रतीत होते की हे एक मंदिर असावे. पण बरीच खचल्यामुळे जास्त काही अंदाज बांधता येत नाही.येथून आजूलाबाजूला साधारण ३०० मी. च्या परिसरात १० -१५ उद्‌ध्वस्त बांधकामे तशीच ७-८ टाकी आढळून येतात. गडाच्या वायव्य भागात एकमेकांना लागून अशी सात टाकी आहेत, ही टाकी सप्त मातृकांशी निगडित आहेत. गडाच्या याच भागात बर्‍यापैकी तटबंदी असून, आग्नेय भाग कड्यांनी व्यापला आहे. ज्या भागात तटबंदी आहे, त्या भागात या तटबंदीच्या बाजूने फिरण्यास जागा आहे ही बहुदा गस्त घालण्यासाठी असावी. या ठिकाणी बराच उतार असून काही ठिकाणी हौद आहेत. थोडे पुढे उजवीकडे गेल्यावर एका मंदिराचे अवशेष आढळतात. येथेही बरेच शिल्पकाम आढळते. ज्या ठिकाणी तटबंदी ढासळलेली आहे, तिथे चिर्‍याचे दगड गडग्यासारखे रचून ठेवले आहेत. हे कोणाचे काम असावे हे कळत नाही. इशान्य भागात ज्या ठिकाणी तटबंदी संपते, त्या ठिकाणी कातळकोरीव गुहा आहेत. या पहारेकर्‍यांच्या चौक्या असाव्यात. एक गुहा अगदी सुस्थितीत आहे. गुहेत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला हौद सदृश साधारण ५ फूट खोलीचे बांधकाम आढळते. या गुहेलगत असलेल्या तटबंदीच्या खाली भुयारी मार्गाचे प्रवेशद्वार आहे असे ग्रामस्त सांगतात, येथे रॅपलिंग करून जाता येते.
यापुढे आपण गडाच्या पूर्वेस येतो. या भागात कोणतेही अवशेष नाहीत. बेलाग कड्यांनी हा भाग व्यापला असल्यामुळे इथे तटबंदी नाही. हा भाग बराच विस्तीर्ण असूनही निर्जन आणि ओसाड आहे. जवळ जवळ अर्ध्या किमीच्या परिसरात एकही बांधकाम आढळत नाही. गडाच्या दक्षिण बाजूला आणि नैऋत्येस आपल्याला तुरळक अशी तटबंदी आढळते. इथेच पाण्याची दोन टाकी आहेत. इथून पुन्हा पश्चिमेकडे निघाल्यावर आपल्याला मजबूत अशा तटबंदीचे दर्शन घडते. दोन बुरूजही आढळतात इथून आपण टेकडी कडे निघतो, मंदिर पाहायला.
गडाच्या सर्वात उंच भागात चामुंडा देवीचे मंदिर आहे. मंदिरातील मूर्ती प्राचीन असून बांधकाम मात्र नवीन आहे. आजुबाजूला जुन्या मंदिराचे अवशेष विखुरलेले दिसतात. एक तुटलेली मूर्ती आढळते, जी एखाद्या ऋषीचे प्रतीक असावी. तसेच एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या चामुंडा देवीच्या मंदिरासमोर आढळणारा नंदी . जुन्या अवशेषांमध्येही नंदीची मूर्ती आढळते. याचा अर्थ हा होतो की जवळच कुठेतरी शिवलिंग असावे आणि काळाच्या ओघात हरवले असावे. ग्रामस्थांनी श्रमदानाने जसे नवीन देऊळ बांधले तशी शेजारी असलेली दीपमाळही बांधण्याचा प्रयत्न केला आहे. ही दीपमाळ असे सुचवते की इथे एक शिवमंदिर असावे.
एकंदरीत पाहता, गडाचा घेरा विस्तीर्ण आहे. साधारण ५ - ६ किमीचा परीघ असावा. गडाच्या इशान्येस असणार्‍या गुहांचा अभ्यास होणे महत्त्वाचे आहे. या वास्तूंविषयी बर्‍याच दंतकथा प्रचलित आहेत. गडावर सातवाहन संस्कृतीचा प्रभाव आहे. या किल्ल्यांचा इंग्रजांनी पूर्ण नायनाट करण्याचा प्रयत्न केला, पण ते सफल झाले नाहीत.

गडावर जाण्याच्या वाटा:  
 नाणेघाटापासून जुन्नरच्या दिशेने १५ कि.मी च्या आसपास चावंड वसलेला आहे. गडावर  जाण्यासाठी चावंड गावापासून १ तास लागतो.

 राहण्याची सोय :  गडावरील कोठारांमध्ये १५ ते २० जण राहू शकतात, तर चामुंडा मातेच्या मंदिरात २ जणांना राहाता येइल, इथे उंदीर त्रास देऊ शकतात. चावंडवाडीत रहाण्याची उत्तम सोय होते.

 पाण्याची व जेवणाची व्यवस्था : गडावर जेवणाची सोय नाही ,मात्र चावंड गावात जेवणाची सोय होऊ शकते. गडावर अनेक टाकी आहेत ज्यामध्ये बारामही पिण्याचे पाणी आहे.


 नोट : वरील सर्व माहिती काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

No comments:

Post a Comment