Tuesday 30 April 2013

शिवरायांचे शिलेदार - मोरोपंत त्र्यंबक पिंगळे.


मोरोपंत त्र्यंबक पिंगळे (जीवनकाळ: इ.स.चे १७ वे शतक) हे छत्रपती शिवाजीराजांच्या काळातील मराठा दौलतीचे पंतप्रधान, अर्थात पेशवा होते. मोरोपंत त्र्यंबक पिंगळे हे शिवाजीराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री होते. स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर यांना देखरेख ठेवावी लागत असे. महाराजांच्या गैरहजेरीत राजाचा प्रतिनिधी या नात्याने राज्यकारभार पंतप्रधानालाच सांभाळावा लागत असे यावरुन या पदाचे महत्त्व लक्षात येते. पंतप्रधानाला वार्षिक १५ हजार होन, पगार मिळत असे.

इ.स. १६५९च्या प्रतापगडाच्या लढाईत अफजलखानास मारल्यावर विजापुरी सैन्यावर मराठा फौजांनी हल्ला चढवला, तेव्हा मोरोपंत त्र्यंबक पिंगळ्यांनी सैन्याच्या एका तुकडीचे नेतृत्व केले. फेब्रुवारी, इ.स. १६७१च्या सुमारास त्यांच्या सेनापतित्वाखालील मराठा फौजांनी मुघलांच्या ताब्यातील पश्चिम खानदेश व बागलाण या प्रदेशांत चढाया केल्या.

इ.स. १६७२मधील उत्तर कोकणातील कोळी राज्यांविरुद्धच्या मराठा मोहिमेचे नेतृत्व पिंगळ्यांनी केले[१]. या मोहिमेत ५ जून, इ.स. १६७२ रोजी मराठ्यांनी कोळ्यांचा राजा विक्रमशाहाच्या सैन्याचा पराभव करत जव्हाराचा पाडाव केला. त्यानंतर मराठा सैन्याने उत्तरेस रामनगराकडे कूच केले. मराठा आक्रमणामुळे रामनगराचा कोळी राजा सोमशाह परागंदा झाला. मात्र पावसाळा सुरू झाल्यामुळे व मुघल सेनापती दिलेरखानाच्या सैन्याची जुळवाजुळव सुरू झाल्याने पिंगळ्यांनी रामनगरातून माघार घेतली. सैन्याची पुन्हा जुळवाजुळव करून जुलै, इ.स. १६७२च्या सुमारास पिगळ्यांच्या सेनापतित्वाखाली मराठ्यांनी रामनगराचा मुलूख जिंकून घेतला.

संदर्भ :  जदुनाथ सरकार. शिवाजी अँड हिज टाइम्स, इ.स. १९५२ (इ.स. २०१०चे पुनर्मुद्रण), ओरिएंट ब्लॅक स्वान. आय.एस.बी.एन. ९७८-८१-२५०-४०२६-२. (इंग्लिश मजकूर).

  ||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥

No comments:

Post a Comment