Thursday 31 May 2012

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले आमनेर ।।


आमनेर किल्ला


 किल्ल्याचा प्रकार : ............
जिल्हा : अमरावती
श्रेणी :  मध्यम


आमनेरचा किल्ला अथवा झिल्पी आमनेर किल्ला हा एक अपरिचित असा किल्ला आहे. मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेला आमनेरचा किल्ला महाराष्ट्रातील विदर्भामध्ये मोडतो. विदर्भातील अमरावती जिल्ह्याच्या वायव्येला हा किल्ला आहे. अमरावतीच्या धारणी तालुक्यामध्ये हा किल्ला आहे.आमनेरचा किल्ला तापीनदी आणि गडगा नदी यांच्या संगमावर असलेल्या छोट्याशा टेकडीवजा उंचवट्यावर बांधलेला आहे. बाहेरुन सुरेख दर्शन देणारा हा किल्ला आतून मात्र मरणपंथाला लागलेला दिसतो. दुर्लक्षीत आणि दुरावस्थेत गेलेला आमनेरचा किल्ला मनाला चटका लावून जातो.

इतिहास:
आमनेरचा किल्ला नेमका कोणी व केव्हा बांधला याबाबत इतिहास कळत नाही.हा किल्ला १२व्या ते १३व्या शतकापासुन अस्तित्वात असावा. तीनही बाजुस पाणी आणि एका बाजुस खंदक अशी या किल्ल्याची रचना आहे. सन १७६९ साली या किल्ल्यावर पेशव्यांचा मुक्काम झाला होता असे इतिहासकार सांगतात.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे:

गडगा नदीच्या काठावरुन आमनेर किल्ल्याचे सुरेख दर्शन घडते. गडगा नदी ओलांडून गेल्यावर डावीकडे किल्ल्याचा ढासळत चाललेला बुरुज आपल्याला दिसतो. या बुरूजाकडे चढणाऱ्या वाटेने थोडेसे चढल्यावर उजवीकडे असलेल्या तटबंदीवर चढण्यास वाट आहे. या तुटक्या तटबंदीमधून गड प्रवेश होतो.गडाच्या मध्यभागी मारुतीचे लहान मंदिर आहे. त्यामागे वाड्याचे मोठे जोते शिल्लक असून त्याला मोठे तळघर आहे. चौकोनी आकाराच्या या छोट्याशा आटोपशीर किल्ल्याचे क्षेत्रफळ अगदी कमी आहे. त्यातूनही आत असलेल्या अनेक इमारती काळाच्या ओघात नष्ट झालेल्या आहेत.या किल्ल्यास ८ बुरुज असून त्यापैकी ७ शाबुत आहेत. नदीतील पाण्याच्या माराने एक बुरुज भग्न झाला आहे.काळ्या पाषाणात वितळविलेले शिसे ओतुन याचा पाया मजबुत करण्यात आलेला आहे.यात जोडांसाठी चुन्याचा वापर करण्यात आलेला आहे. या किल्ल्यावर शिवाचे मंदिर आहे. यास सोमेश्वर म्हणतात.
 गुप्तधनाच्या आशेने अनेक ठिकाणी खोदकाम केलेले दिसते. गडाचा मुख्य मार्ग उत्तराभिमुख असून त्या मार्गावरील दरवाजा नष्ट झाला आहे. तटबंदीही बरीचशी ढासळलेली आहे. चार कोपऱ्याला चार आणि मधे दोन दोन बुरुज मिळून किल्ल्याला एकंदरीत बारा बुरुज आहेत. तापी आणि गडगाच्या संगमाकडील बुरुजावरुन नदीचे उत्तम दर्शन होते. या बुरुजाच्या आतील बांधकामामध्ये राहण्याची सोय केलेली दिसते. याच तटबंदीमध्ये तापीनदीकडे जाणाऱ्या मार्गावर एक दिंडी दरवाजा आहे. ती वाट मोडल्यामुळे अवघड झालेली आहे.

गडावर जाण्याच्या वाटा: 

गडगा नदी ओलांडून गेल्यावर डावीकडे किल्ल्याचा ढासळत चाललेला बुरुज आपल्याला दिसतो. या बुरूजाकडे चढणाऱ्या वाटेने थोडेसे चढल्यावर उजवीकडे असलेल्या तटबंदीवर चढण्यास वाट आहे. या तुटक्या तटबंदीमधून गड प्रवेश होतो. 

गडावर राहण्याची सोय : गडावरती राहण्यासाठी नाही .

जेवणाची सोय : येथे जेवणाची सोय नसल्याने जेवणाचे साहित्य आपण स्वतःच घेऊन 
जावे लागते .


गडावर पाण्याची सोय : गडावरती पाण्याची सोय नाही.

जाण्यासाठी लागणारा वेळ : संपूर्ण गडफेरी करण्यासाठी आपल्याला दोन ते तीन तासांपेक्षा जास्त वेळ लागतो.



नोट : वरील सर्व माहिती "महाराष्ट्र पर्यटन (Maharashtra Tourism)" या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .
 

No comments:

Post a Comment