Monday 9 July 2012

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले लोहगड ।।


लोहगड किल्ला

किल्ल्याची उंची : ----- 
किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग 
डोंगररांग : लोणावळा 
जिल्हा : पुणे 
श्रेणी : सोपी


इतिहास : 

लोहगड किल्ला हा अति मजबूत, बुलंद आणि दुर्जेय आहे.गडाची निर्मिती जवळ असलेली भाजे आणि बेडसे हि लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याहि पूर्वी म्हणजे सत्तावीसशे वर्षापूर्वी झाली असावी असे अनुमान निघते. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकुट, यादव या सर्व राजवटी किल्ल्याने पाहिल्या इ.स.१४८९ मध्ये मलिक अहमंदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले. त्यापैकी लोहगड हा एक. इ.स.१५६४ मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुरहण या किल्यावर कैदेत होता. इ.स. १६३० मध्ये किल्ला आदिलशाहीत आला. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड-विसापूर हा सर्व परिसर सुध्दा स्वराज्यात सामील करून घेतला. इ.स.१६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे १३ मे १६७० मराठ्यांनी किल्ला परत जिंकला. पहिल्या सुरात लुटेच्या वेळेस आणलेली संपती नेताजी पालकरांनी लोहगडावर आणून ठेवली होती. इ.स.१७१३ मध्ये शाहूमहाराजांनी कृपावंत लोहगड कान्होजी आंग्रे यांस दिला १७२० मध्ये आंगर्यांकडून तो पेशव्यांकडे आला. १७७० मध्ये नाना फडणविसांचा सरदार जावजी बोंबले याने आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला.इ.स.१७८९ मध्ये नानांनी सोळा कान असलेली एक बाव व तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला, त्याचा अर्थ असा- शके १७११ मध्ये बाळाजी जनार्दन भानू- नाना फडणवीस यांनी हि बाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट यांचेकडून बंधीवली. नानांनी आपले सर्व द्रव्य नित्सुर्यांच्या निगराणीस लोहगडावर आणले. १८०० मध्ये नित्सुर्यांचा कैलासवास झाला. १८०२ मध्ये त्यांच्या पत्नी किल्ल्यावर येऊन राहिल्या. १८०३ मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला. पण नंतर दुसर्या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. ४ मार्च १८१८ ला जनरल प्रोंथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्वप्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्या दिवशी मराठे लोहगड सोडून गेले.   
   

गडावर पाहण्याची ठिकाणे : 
गडावर चढतांना आपल्याला सलग चार प्रवेशद्वारांमधून आणि सर्पाकार मार्गावरून जावे लागते. सर्वप्रथम गणेश १. गणेश दरवाजा:-ह्याच्याच डाव्या आणि उजव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटीलकी देण्यात आली होती. येथे आतील बाजूस शिलालेख आहेत. २. नारायण दरवाजा:- हा दरवाजा नाना फडणीसांनी बांधला. येथे एक भुयार आहे, जिथे भात आणि नाचणी साठवून ठेवण्यात येई. ३. हनुमान दरवाजा:- हा सर्वात प्राचीन दरवाजा आहे. ४. महादरवाजा:- हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. यावर हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे. या दरवाजाचे काम नाना फडणीसांनी १ नोव्हेंबर १७९० ते ११ जुने १७९४ या कालावधीत केले. महादरवाजातून आत शिरताच एक दर्गा लागतो.दर्ग्याच्या शेजारी सदर व लोहारखानाचे भग्न अवशेष आढळतात. याच दर्ग्याच्या बाहेर बांधकामाचा चुना बनविण्याचा घाना आहे. उजवीकडे ध्वजस्तंभ आहे. याच्या जवळच एक तोफ काही हौशी दुर्गप्रेमींनी सिमेंटच्या चौथर्यात बसवलेली आहे. अशीच एक तोफ तुटलेल्या अवस्थेत लाक्ष्मीकोठीच्या समोर पडलेली आहे. ध्वजस्तंभाच्या उजवीकडे चालत गेल्यास लक्ष्मीकोठी आढळते.या कोठीत राहण्याची सोय होते. या कोठीत अनेक खोल्या आढळतात. दर्ग्याच्या पुढे थोडे उजवीकडे गेल्यास थोडा उंचावट्याचा भाग आहे, जिथे एक सुंदर शिवमंदिर आढळते.पुढे सरळ चालत गेल्यास एक छोटेसे तले आहे. हे तळ अष्टकोनी आहे. त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. हि गडावरील पिण्याच्या पाण्याची एकमेव सोय आहे. तिथून पुढे पंधरा ते वीस मिनिटे चालत गेल्यास एक मोठे तळे आढळते. नाना फडणविसांनी या तळ्याची बांधणी केली आहे. हे तळे सोळाकोणी आहे. मोठ्या तळ्याच्या पुढे विन्चुकाट्याकडे जाताना वाद्यांचे काही अवशेष दिसतात. लक्ष्मीकोठीच्या पश्चिमेस विन्चुकाटा आहे. या विन्चुकाट्यास बघून आठवण येते ती म्हणजे राजगडाच्या संजीवनी माचीची. पंदाराशे मीटर लांब आणि तीस मीटर रुंद अशी हि डोंगराची सोंड आहे. विन्चुकाट्यावर जाण्यासाठी एक टप्पा उतरून पलीकडे जावे लागते. गडावरून पहिले असता हा भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो, म्हणून यास विंचूकाटा म्हणतात. या भागात पाण्याची उत्तम सोय आढळते. गडाच्या आजूबाजूचा परिसर न्याहाळण्यासाठी या विंचूकाट्याचा उपयोग होत असावा. या गडावरून येतांना भाने गावातील भाजे लेण्या आवर्जून पहाव्यात. पावसाळ्यातील लोह्गादाचे रूप पहिले कि मनोन्मनी गुणगुणत ......!   
   

गडावर जाण्याच्या वाटा:-  लोहगडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत.   
१) पुण्यावरून अथवा मुंबईवरून येतांना लोणावळ्याच्या पुढे असलेल्या मळवली स्थानकावर उतरावे. तेथून एक्स्प्रेस हायवे पार करून भाजे गावातून थेट लोहगडला जाणारी वाट पकडावी.वाट मोठी प्रशस्थ आहे. तिथून दीड तास चालीनंतर 'गायमुख' येऊन पोहचतो. खिंडीच्या अलीकडे एक गाव आहे त्याचे नाव लोह्गाद्वादी. खिंडीतून उजवीकडे वळले म्हणजे लोहगडास पोहचतो आणि डावीकडे वळले म्हणजे विसापूर किल्यावर पोहचतो. या मार्गेलोहगडावर प्रवेश करतांना चार दरवाजे लागतात.   
२) लोनावल्यावरून दुचाकी अथवा चारचाकी वाहनाने थेट लोहगडवाडी पर्यंत जाता येते. पवना धरणाकडे जाणार्या रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर डावीकडे एक रस्ता लागतो तेथून ३ ते ४ कि.मी. अंतरावर लोहागाद्वादी आहे. उभा चढ आणि अतिशय धोकादायक वळणे आहेत. साधारण अर्ध्या तासाचा प्रवास आहे. मात्र येथे एसटी महामंडळाची सोय नाही. स्वतःचे वाहन असल्यास उत्तम अथवा लोणावळ्यातून trax ने जाता येते भाडे १००० रु आहे.   
३) काळे कॉलनी हि पवना धरणाजवळ वसलेली आहे. तेथून लोहगड आणि विसापूर मधील गायमुख खिंड परिसर व्यवस्थित दिसतो. पवना धरणाच्या खालून एक रस्ता गायमुख खिंडीच्या टेकडीवर जातो. तेथून एक मळलेली पायवाट आपणास लोहगडवाडीत घेऊन जाते.या टेकडीवर अग्रवाल नावाच्या इसमाचा बंगला आहे. या वाटेने किल्ल्यावर जाण्यास २ तास लागतात.   
   
राहण्याची सोय:- लक्ष्मी कोठी रहायची एकमेव सोय आहे. ३० ते ४० जन आरामात राहू शकतात.   
   
जेवण्याची सोय:- आपण स्वतः जेवणाची सोय करावी अथवा लोहगडवाडी मध्ये जेवणाची सोय होते.   
   
पाण्याची सोय:- बारमाही पिण्यासाठी पाणी उपलब्ध आहे.   
   
जाण्यासाठी लागणारा वेळ:- २ तास   


नोट : वरील सर्व माहिती "गडवाट" या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल . 


2 comments:

  1. मित्र ब्लॉग खरच वाचनीय आहे. यातील माहिती सुद्धा वाचनीय आहे. संपूर्ण ब्लॉग वाचणो एका दमात शक्य नाही. म्हणून वेळ मिळाला की नक्की वाचेन.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद मित्रा !!!!


      ||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
      जय जिजाऊ...!
      जय शिवराय...!
      जय शंभुराजे.. .!
      जयस्तू मराठा...!

      Delete