Monday 6 May 2013

शिवरायांचे शिलेदार - बाजी प्रभूदेशपांडे


घोडखिंडीतील (पावनखिंडी) लढाई ही मराठी इतिहासातील एक महत्वाची लढाई मानली जाते, विशेषतः बाजी प्रभूदेशपांडे यांच्या बलिदानामुळे . लढाईनंतर बाजीप्रभू व इतर मराठे सैनिकांचे बलिदानामुळे ही जागा पावन झाली म्हणून घोडखिंडीचे नाव पावनखिंड असे पडले असे म्हटले जाते.

ही लढाई जुलै १३, १६६० रोजी विशाळगडनजीक  घोडखिंड येथे झाली. पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटून शिवाजी महाराज विशाळगडाकडॆ कूच करत होते पर्ंतु आदिलशाही सेनेला त्याचा सुगावा लागला व शिवाजीच्या मागे आदिलशाही सेनेचा पाठलाग चालू ज़ाला. जेव्हा शिवाजी व त्यांचे साथिदार घोडखिंडीत पोहोचले त्यावेळेस बाजी प्रभूदेशपांडे या सरदाराने शिवाजींना विनंतीवजा आदेश् दिला की शिवाजी महाराजांनी पुढे गडावर जावे व जोवर शिवाजी महाराज गडावर पोचत नाहीत तोवर बाजी ही खिंड लढवतील व शत्रुला तिथेच रोखून धरतील. 
 सिद्दी जौहरने शिवाजीं महाराज पन्हाळ्यावर असताना त्याला वेढा दिला व महाराजांची स्थिती बिकट केली. प्रचंड मोठ्या सेनेपुढे पन्हाळा किल्ला टिकवून धरणे अवघड होते. अतिशय बळकट वेढा उठवून लावण्याचे सर्व प्रयत्न फोल झाले व सरते शेवटी जौहरचा सामना करायचा असे ठरवले. परंतु जौहरच्या मोठ्या फ़ौजेचा सरळ सामना करण्याऎवजी त्यांनी जौहरला भूल देउन निसटून् जाण्याचा बेत बनवला व नव्या दमाने दुसर्‍या किल्ल्यावरुन (विशाळगडावरुन्) जौहरचा सामना करायचे ठरले.
जौहरची एकूण फौज १५,००० ची होती तर शिवाजींचे फ़क्त ३०० ते ६०० मावळे होते. लढाईच्या दिवशी रात्री शिवाजींनी पोर्णिमेच्या रात्री गडावरुन उतरून वेढा तोडला व विशाळगडाकडे कूच केली. एका आख्यायिकेप्रमाणे शिवाजींनी आपल्यासारख्याच दिसणार्‍या शिवा काशिद नावाच्या नाव्ह्याला शिवाजी म्हणून जौहरकडे बोलणींसाठी पाठवले होते. व या भेटी दरम्यानच्या काळातच शिवाजींनी पन्हाळ्यावरून पलायन केले. जेव्हा जौहरला शिवाजी महाराज विशाळगडाकडे पळाले आहेत असे सुगावा लागला तेव्हा सिद्दी मसूदला शिवाजींच्या मागावर पाठवले व त्यांचा पाठलाग चालू झाला. काही वेळाने शिवाजी व साथिदार घोडखिंडीत पोहोचले तेव्हा पाठलाग करणारे मसूदचे सैनिक जवळच आहेत याची जाणीव ज़ाली व काही वेळातच ते गाठतील व शिवाजींना व इतरांना पकडतील असा अंदाज होता. घोडखिंडीत अतिशय चिंचोळी वाट होती व एकावेळेस एक-दोन जणच रांगेतून जातील एवढी वाट होती. बाजीप्रभूने शिवाजींना स्थिती समजावून विशाळगडावर प्रस्थान करायचा विनंतीवजा आदेश दिला व जो पर्यंत शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचून तोफानी इशारा करत नाहीत तोवर ही खिंड लढवली जाईल असा विश्वास महाराजांना दिला. शिवाजी महाराजांनी पुढे विशाळगडावर प्रयाण केले.
खिंडीत मसूदचे सैनिक पोहोचल्यावर त्यांना मावळ्यांच्या आडव्या रांगेचा सामना करावा लागला. मावळ्यांच्या मागील रांगांनी तसेच आजूबाजूच्या कड्यांवर चढून दगड गोट्यांची बरसात चालू केली. अतिशय चिंचोळ्या वाटेमुळे केवळ एक दोनच सैनिक मराठ्यांच्या रांगेपर्यंत पोहोचत व मारले जात अश्या प्रकारे मराठ्यांनी मसूदच्या सैनिकांची कत्तल आरंभली. बाजीप्रभू, फ़ुलाजी, संभाजी जाधव, बांदल ह्यांनी आपपल्या कमानीतून मसूदच्या सैनिकांना परास्त केले. बाजीप्रभूच्या आवेशाने अनेकांची गाळण उडवली. मसूदने बंदूकधार्‍यांना कड्यावर चढून बाजीप्रभूवर गोळीबार करण्याचा आदेश दिला. तसे आदेश त्यांनी पार पाडले. बाजीप्रभू जखमी झाला तरी त्याने सैनिकांना कोणत्याही परिस्थितीत आपली जागा सोडू नका असा आदेश दिला. काही वेळातच शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचले व त्यांनी तोफांचा गजर दिला. इकडे घोडखिंडीत बाजीप्रभूने तोफांचा गजर ऎकल्यानंतरच त्याने कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने आपला जीव सोडला.मराठ्यांचे जवळपास सर्वच ३०० जण कामी आले पण मसूदचे प्रचंड नुकसान झाले जवळपास ३००० सैनिक मारले गेले.
इकडे शिवाजींनी पण विशाळगडाचा वेढा तोडला व गडावर प्रवेश केला. विशाळगडाचा किल्लेदार रंगो नारायण सरपोतदार याने मोठ्या शौर्याने किल्ला लढवला व जौहरला इथेही परास्त केले.

लढाईनंतर बाजीप्रभू व इतर मराठे सैनिकांचे बलिदानामुळे ही जागा पावन झाली म्हणून घोडखिंडीचे नाव पावनखिंड असे पडले असे म्हटले जाते. शिवाजींनी या लढाईत बलिदान देणार्‍यांचे यथोचित सत्कार केले. स्वता: बाजीप्रभूंच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले व त्यांच्या मुलांना पालखीचा मान देण्यात आला. संभाजी जाधव यांचा मुलगा संताजी जाधव यांना मराठी सेनेत समावण्यात आले. 

||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥

॥जयोस्तू मराठा॥


नोट : वरील सर्व माहिती काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

No comments:

Post a Comment