Friday 2 August 2013

प्रवास एका शिवभक्ताचा :- || किल्ले रसाळगड ||

रसाळगड
किल्ल्याची ऊंची : १७७० मी .
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग .
डोंगररांग : रत्नागिरी ,कोकण.
 श्रेणी : मध्यम.
जिल्हा : रत्नागिरी.

सह्याद्रीची रांग उत्तर-दक्षिण पसरलेली आहे. मुख्य रांगेपासून सुटावलेल्या अनेक रांगा पाच पंचवीस मैल लांबवर पसरलेल्या आहेत. पोलादपूर सोडून खेडवरून चिपळूणकडे जाताना रसाळगड, सुमारगड, महिपतगड हे तीन दुर्ग आपले लक्ष वेधून घेतात. हे सर्व किल्ले जावळीच्या खोर्‍यातच येतात. प्रतापगड, मधुमकरंद गड, रसाळगड, सुमारगड आणि महिपतगड हा ट्रेकही खूप प्रसिद्ध आहे.

गडावरील पहाण्याची ठिकाणे :
रसाळगडाचा घेरा लहानच असल्याने संपूर्ण गडफेरीस एक ते दीड तास लागतो. रसाळवाडीतून किल्ल्यावर शिरतानाच वाटेत दोन दरवाजे लागतात. पहिल्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोरच तटातील मारुतीचे दर्शन होते. वळसा मारून आपण किल्ल्याच्या दुसर्‍या दरवाजात पोहोचतो. या दरवाजातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच तटावर एक भली मोठी तोफ दिसते. तोफा हे या किल्ल्यांचे मोठे वैशिष्ट्यच आहे. किल्ल्यावर लहानमोठ्या मिळून सुमारे १६ तोफा आहेत.
संपूर्ण किल्ल्याचा माथा म्हणजे एक पठारच होय समोरच झोलाई देवीचे मंदिर आहे. मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. कोनाड्यात अनेक सापडलेल्या मूर्त्या ठेवल्या आहेत. मंदिराच्या समोर दीपमाळ आणि तुळशी वृंदावन आहे. समोरच एक तोफ सुद्धा ठेवलेली आहे. मंदिराच्या बाजूला पाण्याचा मोठा तलाव आहे. हे पाणी पिण्यासाठी योग्य आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला शिवाचे छोटेसे मंदिर आहे. पाण्याच्या टाक्याच्या वरच्या भागाला थोडासा उंचवटा आहे , यालाच बालेकिल्ला म्हणतात. यात वाड्यांचे मोठ्या प्रमाणावर अवशेष आहेत. बुरूजावर तोफा आढळतात. येथून समोरच एक दगडी बांधकाम असलेली खोली आढळते. हे धान्य
कोठार असावे असे वाटते. बालेकिल्ल्याच्या जवळच आणखी एक पाण्याचा तलाव आहे. या दोन्ही तलावात बारामही पाणी असते. किल्ल्याच्या नैऋत्य भागात एक नंदी आहे. मात्र येथे शिवाची पिंड आढळत नाही. किल्ल्यावर पाण्याची टाकी मोठ्या प्रमाणावर आहेत, म्हणजे हा किल्ला पूर्वी मोठ्या प्रमाणावर नांदता असावा.

गडावर  पोहोचण्याच्या वाटा :

१) वाडीबीड गावातून :-
खेड वरून वडगाव बिरमणी कडे जाणारी बस पकडायची आणि वाटेत असणार्‍या हुंबरी फाट्यावर उतरायचे. हुंबरी फाट्यापासून थेट बीड गावात जाणारी वाट पकडायची. साधारणत: बीड गावात पोहोचण्यास एक तास लागतो. वाडीबीड गावातून गडावर जाण्यास मळलेली वाट आहे. या मार्गाने किल्ल्यावर पोहचण्यास दीड तास लागतो.
) रसाळवाडी मार्गे:-
खेड वरून निमनी गावात जाण्यासाठी बसेस सुटतात. निमनी गावात उतरून एका तासात रसाळवाडी मार्गे किल्ला गाठता येतो. वाट अत्यंत सोपी आहे.
) मौजे जैतापूरहून - रसाळवाडी मार्गे :-
खेड वरून मौजे जैतापूर गावात जाणारी एस टी पकडावी. मौजे जैतापूरहून रसाळवाडी मार्गे दोन तासात रसाळगड गाठावा. वाट अत्यंत सोपी आहे.

गडावर राहाण्याची सोय : झोलाई देवीच्या मंदिरात ३० ते ४० माणसे राहू शकतात.

जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही, आपण स्वत करावी

पाण्याची सोय : गडावर पिण्याचे पाणी बारामही उपलब्ध आहे.

गडावर  जाण्यासाठी लागणारा वेळ :
रसाळवाडीतून गडावर जाण्यास १ तास लागतो.


 नोट : वरील सर्व माहिती "  शिवकालीन महाराष्ट्र' "  या facebook  वरील पेज मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .  

No comments:

Post a Comment